मुंबई – संपूर्ण देश करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच देशातील काही राज्यांना तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये चक्रीवादळाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. मुंबईपासून ३५ सागरी मैल दूर अरबी समुद्रामध्ये अनेक जहाजे चक्रीवादळामुळे अडकून पडली होती. ( cyclone Tauktae )
समुद्रामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदलाचे रेस्क्यू ऑपरेशन गेल्या तीन दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या भक्षस्थानी सापडलेले एक बार्ज पी-३०५ बुडाले असून यातील १८६ जणांना आतापर्यंत सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर २६ जणांचे मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आलेत. भारतीय नौदलाचे रेस्क्यू ऑपरेशन अद्याप सुरु आहे.
दरम्यान, बार्ज पी-३०५ मधून सुखरूप बाहेर पडलेल्यांनी भारतीय नौदलाचे आभार मानले असून चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्रात अडकून पडले असतानाची भयकथा सांगितली आहे. ( cyclone Tauktae )
बार्ज पी-३०५मधील एक कर्मचारी स्वप्नील सावंत याने नौदलाचे आभार मानताना, ‘समुद्राच्या लाटा खूप उंच होत्या. परिस्थिती खूपच भयावह होती. आपले प्राण धोक्यात घालून नौदलाने आमचे प्राण वाचवले. मी भारतीय नौदलाचे आभार मानतो’ अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. ( cyclone Tauktae )
बार्ज पी-३०५ वरील एक अन्य कर्मचारी अमित कुमार कुशवाह यांनी अंगावर शहरे आणणारा अनुभव सांगितला आहे. ते म्हणतात, “बार्ज पी-३०५ बुडत होते. ते बुडत असल्याने मला खवळलेल्या समुद्रात उडी घ्यावी लागली. मी समुद्राच्या उंच लाटा व वरून धो-धो कोसळत असलेल्या पावसात ११ तास केवळ लाईफ जॅकेटच्या भरवशावर तरंगत होतो. यानंतर तेथे नौदल पोहचलं व त्यांनी आम्हाला वाचवलं.”
यातून बचावलेल्या आणखी एका कर्मचाऱ्याने आपला अनुभव सांगताना, “मी नौदलाची मदत पोहचण्यापूर्वी जखमी झालेलो. अशा परिस्थितीत जर नौदलाचे अधिकारी येथे आमच्या मदतीसाठी आले नसते तर आमच्यापैकी कोणीही जिवंत राहू शकलं नसत. नौदलाचे खूप-खूप आभार. आज मी केवळ त्यांच्यामुळेच जिवंत आहे.”
या चक्रीवादळामध्ये एक टगबोट वरप्रभा देखील चक्रीवादळामुळे भटकले होती. तिला देखील नौदलाने वाचवले. याखेरीज अन्य दोन बार्ज व ऑइल रिंगमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांची देखील नौदलाने सुटका केली. ( cyclone Tauktae )