World Cup 2023 IND v PAK Match Updates : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी (14 ऑक्टोबर) विश्वचषकात सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. सध्याच्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांचा फॉर्म चांगला आहे. भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे. त्याचवेळी पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंकेचा पराभव केला आहे. आता रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्या नजरा विजयाची हॅट्ट्रिक करण्यावर असतील. दरम्यान, हवामानाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
लक्षवेधी – एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पाहिल्यास भारत आणि पाकिस्तान हे संघ आतापर्यंत 7 वेळा आमनेस-सामने आले आहेत. त्या सातही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. आताही ही विजयी परंपरा कायम ठेवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
अनेक दिवसांपासून चाहते या सामन्याची वाट पाहत होते. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. प्रत्येकाला रोमांचक सामना पाहायचा आहे, परंतु पावसामुळं चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडू शकतं . भारतीय हवामान खात्याने (IMD) अहमदाबाद शहर आणि उत्तर गुजरातमध्ये सामन्यादरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा येण्याची शक्यता असली तरी सामना रद्द होण्याची शक्यता कमी आहे मात्र, पावसामुळे काही काळ खेळ थांबू शकतो.
हवामान खात्याने काय म्हटले?
भारतीय हवामान खात्याने (IMD) शेअर केलेल्या नवीनतम हवामान अपडेटनुसार, 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी उत्तर गुजरात आणि अहमदाबादच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने सांगितले की, “गुजरातमध्ये पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. अहमदाबादमधील हवामान केंद्राच्या संचालिका मनोरमा मोहंती यांनी सांगितले.”आकाश ढगाळ राहील. दुसऱ्या दिवशी अहमदाबाद आणि बनासकांठा, साबरकांठा आणि अरवली सारख्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडू शकतो.”
पावसामुळे सामना रद्द झाला तर?
पावसामुळे सामना रद्द झाला तर भारत आणि पाकिस्तानला प्रत्येकी एक गुण मिळेल. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही. स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस आहेत. परंतु अशी परिस्थिती उद्भवू नये आणि संपूर्ण सामना पाहायला मिळावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे –
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी , मोहम्मद वसीम.