पुणे :- एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज (गुरुवार) यजमान भारतीय संघाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. बांगलादेशला या स्पर्धेत पराभवांचा सामना करावा लागला असला तरीही त्यांच्या संघाला कमी लेखण्याची चुक भारतीय संघाला महागात पडू शकते. पुण्यात या दोन संघात ही पहिलीच लढत होणार आहे.हा सामना दुपारी दोन वाजता सुरू होईल.
आतापर्यंतची कामगिरी पाहता भारतीय संघाचेच पारडे जड राहील असा इतिहास आहे. या दोन संघात आतापर्यंत 40 एकदिवसीय सामने झाले असून त्यातील 31 सामने भारताने जिंकले आहेत. बांगलादेशला 8 सामन्यांत विजय मिळाला आहे तर एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही.
विश्वकरंडकाबाबत बोलायचे झाले तर आजवर या दोन संघात झालेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामने भारताने तर एक सामना बांगलादेशने जिंकला होता. 2007 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत याच संघाने भारताचा पराभव करत साखळीतच बाहेर पडण्याची नामुष्की आणली होती.
पुण्यात आतापर्यंत भारताने 7 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यातील 4 सामने जिंकले आहेत, तर 3 सामने गमावलेही आहेत. गहुंजे स्टेडियमवर अखेरचा सामना भारताने 2021 साली खेळला होता व त्यात इंग्लंडचा पराभव केला होता.
या मैदानाची खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी ठरते. या मैदानावर आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 4 सामने जिंकले आहेत तर दुसऱ्या डावात खेळणाऱ्या संघाने 3 सामने जिंकले आहेत. या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 307 आहे. या मैदानावर सर्वोच्च धावसंख्या 356 आहे. ही धावसंख्या भारताने इंग्लंडविरुद्ध उभारली होती. या मैदानावरील भारत वि. बांगलादेश हा आठवा वनडे सामना असेल.
भारत व बांगलादेशची विश्वकरंडकातील कामगिरी
2007 : बांगलादेश 5 गडी राखून विजयी
2011 : भारत 87 धावांनी विजयी
2015 : भारत 109 धावांनी विजयी
2019 : भारत 28 धावांनी विजयी