मुंबई – भारताचा परकीय व्यापार वाढत आहे. त्याचबरोबर भारताने परकीय चलन संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. त्यामुळे भारताची यावर्षी चालू खात्यावरील तूट राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ 0.80% राहण्याची शक्यता आहे. (Current account deficit will decrease)
गेल्या वर्षी ही तूट दोन टक्के होती. त्यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव आला होता. आता ही तूट कमी होणार असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावरील दबाव कमी होणार आहे. एकूण परिस्थिती पाहता पुढील आर्थिक वर्षात भारताची चालू खात्यावरील तुट 1.3 टक्के इतकी माफक राहण्याची शक्यता यूबीएस सिक्युरिटीज या संस्थेने व्यक्त केली आहे.
या संस्थेने या सदर्भातील आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारत सरकारने प्रयत्न केल्यामुळे खनिज तेलाचे आणि कोळशाची आयात कमी झाली. विशेषत: कोळशाची आयात कमी करण्यात भारत सरकारला चांगले यश मिळाले.
त्याचबरोबर सेवा क्षेत्राच्या निर्यातीमधून भारताला चांगले उत्पन्न मिळत आहे. आयात आणि निर्यातीमधील तूट कमी होत आहे. त्यामुळे भारताची चालू खात्यावरील तूट कमी होणार असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
जर खनिज तेलाचे दर वाढले तर हे समीकरण बिघडू शकते असे समजले जात आहे. मात्र सरकारने रुपयाच्या माध्यमातून अनेक देशाबरोबर व्यापार सुरू केला असल्यामुळे अशी शक्यता कमी असल्याचे समजले जात आहे. दरम्यानच्या काळात सरकारने अनेक देशाबरोबर मुक्त व्यापार करार केला आहे. त्यामुळे भारताची निर्यात वाढण्यास मदत होणार आहे.