संतोष पवार
मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा
सातारा – राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन शनिवारी बहुमत सिद्ध झाल्याने आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिंमंडळात जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागेल, पालकमंत्री कोण असेल, याची उत्सुकता जिल्हावासियांना लागून राहिली आहे. आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शंभूराज देसाई, आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा असून लाल दिवा कोणाला मिळणार हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
राज्यात गेले महिनाभर चाललेल्या सत्ता नाट्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर शनिवारी ठाकरे सरकारने विश्वासदर्शक ठरावही जिंकला असल्याने आता राज्याला मंत्रीमंडळ विस्ताराची उत्सुकता लागून राहिली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन, कॉंग्रेस एक, भाजप दोन, शिवसेना दोन असे आमदार निवडून आले आहेत. वाईचे आ. मकरंद पाटील, कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील, कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण, पाटणचे आ. शंभूराज देसाई यांना मंत्रिपद मिळणार का, याची उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कै. लक्ष्मणराव पाटील यांचे संबंध सर्वज्ञात आहेत. सत्ता असतानाही आणि नसतानाही लक्ष्मणतात्या आणि त्यांचे चिरंजीव आ. मकरंद पाटील यांची पवारांवरील व पक्षावरील श्रद्धा कमी झाली नाही. या विस्तारात मकरंद पाटील यांच्या रुपाने वाई मतदारसंघात लाल दिवा येईल, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. आ. बाळासाहेब पाटील यांनीही पहिल्यापासून शरद पवारांवर श्रध्दा ठेवत आपले कार्य सुरु ठेवले. पवारांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. कराड येथे नुकत्याच झालेल्या दौऱ्यात पवार यांनी बाळासाहेब पाटील यांच्या मंत्रिंमंडळातील समावेशाचे संकेत दिले होते. त्यामुळे कराड उत्तरमधील जनतेलाही बाळासाहेब मंत्री होतील अशी आशा लागून राहिली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला तर जिल्ह्यात पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसला बळकटी मिळणार असल्याने चव्हाण यांचे मंत्रिपद कन्फर्म मानले जात आहे. चव्हाण देशाच्या राजकारणात राहिल्याने व त्यांच्या कामाचा कॉंग्रेस मजबुतीकरणासाठी उपयोग होणार आहे. पाटणचे आ. शंभूराज देसाई कायम शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत. जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम देसाई यांच्या माध्यमातून झाले आहे. उद्धव ठाकरे यांनीही नेहमी शंभूराज यांना ताकद देण्याचे काम केले असून देसाईंच्या रुपाने जिल्ह्यात शिवसेनेचा मंत्री मिळून शिवसेनेचा विस्तार हाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देसाई यांचा समावेशही निश्चित मानला जात आहे.
सातारा व माण विधानसभा मतदारसंघ वगळता जिल्ह्यात आघाडीचे आमदार आहेत. या सहा आमदारांपैकी चार आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक असून त्यातील किती जणांना लाल दिवा मिळणार, जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार, याचीच उत्सुकता लागून राहिली आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यानंतर विस्ताराचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
शशिकांत शिंदेंचे काय होणार?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी सत्ता नसतानाही जिल्ह्यातील राष्ट्रवादीला बळकटी देण्याचे काम केले. अनेक दिग्गज पक्ष सोडून गेले असतानाही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आधार दिल्याने जिल्ह्यात पक्षाला चांगले यश मिळाले. मात्र, शिंदे यांना कोरेगाव मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून शिंदे यांची ओळख असून आत्तापर्यंत शिंदे यांच्यावर पक्षाने महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्यामुळे शिंदे यांना पक्षनिष्ठेचे फळ मिळणार का, याचीही उत्सुकता आहे.