सुबोधकुमार जयस्वाल यांचे वाहतूक शाखेला आवाहन
पुणे –“वाहतूक नियमन हे पोलिसांच्या अनेक कामांपैकी एक काम आहे. तेथील कॉन्स्टेबलच सर्वप्रथम नागरिकांशी संपर्कात येतो. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. तेथे काळजीपूर्वक आणि मेहनतीने काम करावे लागत असून खाकीला डाग लागेल, असे काम करू नका,’ असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी शनिवारी केले.
येरवडा येथील वाहतूक शाखेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन जयस्वाल यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते.
जयस्वाल म्हणाले, “राज्यात दरवर्षी प्राणघातक अपघातात 30 हजार जणांना मृत्यू होतो. हे प्रमाण कमी करण्याकडे सर्व अधिकाऱ्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
प्राणघातक अपघात कमी करण्यासाठी पोलिसांनी काय केले, यावर सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष आहे. पुण्यात प्राणघातक अपघातांचे प्रमाण कमी झाले, हे मी राज्यातील पोलीस दलाला उदाहरण देऊन अपघात कमी करण्याचे “टार्गेट’ देणार आहे. दीक्षांत परेडच्या वेळी जी शपथ घेतो, ती आजसुद्धा माझ्या कार्यालयात आहे, त्या शपथेप्रमाणे आपले काम आहे का हे मी मला विचारतो.’
डॉ. म्हैसेकर म्हणाले, “महानगर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत प्रामुख्याने वाहतुकीच्या समस्यांवर चर्चा होते. जिल्ह्यात वाघोली, चाकण येथे सर्वाधिक कोंडी दिसून येते. पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी जी मदत पोलिसांना लागेल, ती देण्यास आम्ही तयार आहोत.’ प्रारंभी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी प्रास्ताविकात वाहतूक शाखेने केलेल्या कामगिरीची माहिती दिली. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी आभार मानले.
दहा वर्षापूर्वी एखाद्या ठिकाणी जाण्यास 30 मिनिटे लागत होती. 2008 मध्ये पुणे पालिकेने कॉम्प्रेहेसिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार केला. त्यातील बरेच राहून गेले. मधल्या काळात वाहने वाढली, पण आपण काही केले नाही. आता तेवढ्याच अंतरासाठी दीड तास लागतो. शहरात आता वाहतुकीचा वेग केवळ ताशी 18 किमी प्रतितास इतका आला आहे.
डॉ. के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे.