मुंबई : राज्यात संचार बंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोमवारी केली. अत्यावश्यक सेवांना या संचार बंदीतून वगळण्यात आले असून सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थाळांवर बंदी घालण्यात आली असून केवळ पुजारी अथवा धर्मगुरूंना धार्मिक विधीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. या निर्णायक टप्प्यांवर आपण साथ दिली तर कोरोनाला आपण पराभूत करू शकू, असे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचे आदेश त्यांनी दिले.
पंतप्रधानांनी काल जाहीर केलेल्या जनतेच्या संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिससाद दिल्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो. पण टाळ्या आणि थाळ्या वाजवणे म्हणजे विषाणू घालवला असे नव्हे. हा डॉक्टर्स आणि सिस्टर्सना मानाचा मुजरा आहे. पण लक्षात घ्या, धोक्याचा सायरन वाजला आहे. हा निर्णायक टप्पा आपण ओळखला नाही तर जगभरात जसे या विषाणूंनी थैमान घातले तसे थैमान येथेही घालेल, हे लक्षात घेतले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
राज्यात जमावबंदीचे आदेश लागू केले होते. मात्र त्यानंतर नाईलाजाने आता संचारबंदी लागू करावी लागत आहे, असे ते म्हणाले. हे दिवस मौजमजा करण्याचे नाहीत तर खबरदारी बाळगण्याचे आहेत, असे त्यांनी सांगितले.
आंतर जिल्हा प्रवासबंदी लागू
राज्यात काही जिल्ह्यात अद्याप कोरोनाची बाधा झाली नाही. त्यांना संपर्कहीन अवस्थेत ठेवावे लागेल. त्याचबरोबर जेथे बाधीत असतील तेथेच त्य ाविषाणूला गाडावे लागेल. त्यामुळे आंतर जिल्हा सीमा सील करण्याचे आदेश त्यांनी दिले. मात्र त्यातून जीवनावश्यक सेवांना वगळण्यात आले आहेत. खासगी वाहने, बसेस आणि अन्य वाहनांवर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू , औषधे, या दोन्हीचे उत्पादक, त्यासंदर्भातील वाहतूक, बेकरी, पशुखाद्याची दुकाने, शेतीविषयक व्यवसाय यांना वगळण्यात आले आहे.
काही अत्यावश्यक किंवा जीवनावश्यक कारणासाठी बाहेर पडायचे असल्यास टॅक्सी आणि रिक्षा वापरता येतील. मात्र रिक्षात चालक आधिक एक, आणि टॅक्सीत चालक अधिक दोन अशी प्रवासी मर्यादा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. जीवनावश्यक गोष्टींसाठीच ही सेवा वापरावी, असे त्यांनी सांगितले.
जर वैद्यकीय क्षेत्रात मनुष्यबळाची कमी पडली तर अंगणवाडी सेविका आणि होमगार्ड यांना प्रशिक्षण देऊन सेवेसाठी तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ही कठोर उपाय योजना जनतेच्या हितासाठी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.