शिराळा – सांगली, सातारा, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर व शिराळा तालुक्याच्या पश्चिमेला असणारे चांदोली राष्ट्रीय अभयारण्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने चांदोली अभयारण्यात दाखल होत आहेत. चांदोली अभयारण्य पाहण्यासाठी एक दिवसाची परवानगी मिळते, मात्र राहण्यासाठी नाही.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभयारण्यातील स्थळे पर्यटकांना पाहता येतात. अभयारण्यात मोटरसायकलला परवानगी नाही. मात्र चारचाकी गाडी घेऊन अभयारण्यात जाता येते. वाहनांसाठी दीडशे रुपये, गाईडसाठी तीनशे रुपये, लहान मुलांना पंधरा रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते. पर्यटकांनी जर चारचाकी गाडी आणली नाही तर भाड्याने व ओपन होंडाची गाडी पर्यटकांच्या सोयीसाठी ठेवण्यात आली आहे.
चांदोली धरणाचा विस्तीर्ण जलाशय अभयारण्यातील स्थळे ही पर्यटकांसाठी खास आकर्षण आहेत. सांगली जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र , गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक चांदोली अभयारण्य पाहण्यासाठी गर्दी करत असतात. अभयारण्याचे क्षेत्र 19 हजार हेक्टर व 309 चौरस किलोमीटर आहे. अभयारण्यामध्ये शिराळा तालुक्यातील 19, शाहूवाडीतील नऊ, पाटण तालुक्यातील तीन, संगमेश्वर मधील एक अशी गावे समाविष्ट आहेत. चांदोली अभयारण्याचा समावेश 39 व्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाला आहे.
अभयारण्यात गवे, बिबटे, रान डुक्कर, भेकर, शेकरू, अस्वल प्राणी आढळतात. अंजनी, जांभूळ, हिरडा, चांदा, बहावा, करडा, नरक्या, आंबा, फणस, उंबर, करवंद, शिकेकाई, मुरुडशेंग, सर्पगंधा, नरक्या चंदन, बांबूची व वेताची बेटे आहेत. अभयारण्यातील ताडाच्या झाडांचा लिलाव होतो. अभयारण्यात मोर, लांडोर, घाणेरी, बहिरी, ससाणा, पाणकोंबड्या, भारद्वाज, खंड्या, सुतारपक्षी, घनवटी, सर्प, गरुड पक्षी आहेत.
चांदोली अभयारण्यात असलेला वसंत सागरचा विस्तीर्ण जलाशय आहे. धरणाची क्षमता 34 टीएमसी आहे. या पाणी साठ्यामध्ये रोहा, मरळ, कटला, तबला, दोगरा माशांच्या जाती आढळतात, तसेच मगर व सुसर आहेत, प्राणी व पक्षी यांचे दर्शन घेता यावेत यासाठी जाधव वाडी, जनीचा अंबा, राम नदी, तनाळी, करमाळा या ठिकाणी टॉवर आहेत.
चांदोली अभयारण्यात कोझोन क्षेत्रात असलेल्या प्रचीत गड किल्ला पर्यटकांना अभयारण्याच्या मार्गाने पाहता येत नाही. मात्र, नायरी मार्गे या गडावर जाता येते. चार जिल्ह्यांच्या सीमेवर हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा खजिना या किल्ल्यावर आहे. अत्यंत दुर्गम चढण्यास कठीण असा किल्ला आहे. धर्मवीर संभाजी राजांना संगमेश्वर येथून कैद करून या मार्गे आणण्यात आले होते. या ठिकाणी भवानी मंदिर, राजवाड्याचे अवशेष, तोफा, पाण्याची कुंडे आहेत.
चांदोली अभयारण्यात वारणा नदी उगम पावत असून कंदार धबधब्यात आता कमी पाणी आहे. कलावंतीन यांची विहीर, भैरवगड, राम नदी असा पर्यटनस्थळे आहेत. चांदोली धरणात बोटिंगची सुविधा करावी अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.