मुंबई (प्रतिनिधी) – विधानसभेच्या निवडणूकीत भाजपने 1 कोटी 42 लाख मते मिळवत 105 आमदार निवडून आले आहेत. अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपकडे असलेल्या आमदारांची संख्या 119 आहे. त्यामुळे राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही, असे सांगत भाजपचेच सरकार पुन्हा येईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले.
दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात भाजपाने तीन दिवसीय चिंतन बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी पत्रकारांना माहिती देताना चंद्रकांत पाटील बोलत होते. राज्यात सध्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्यांच्यावर भाजपचे पूर्ण लक्ष असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकांचा निकाल पाहिल्यानंतर भाजपाच राज्यात क्रमांक एकचा पक्ष असल्याचे सिद्ध होते.
भाजपला 1 कोटी 42 लाख मते मिळाली. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 92 लाख मते घेउन राष्ट्रवादी कॉंग्रेस आहे. त्यानंतर शिवसेनेला 90 लाख मते मिळाली आहेत. म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरील पक्षही भाजपपासून खूप दूर आहेत. मागच्या निवडणुकीत भाजपा 260 जागा लढली होती, त्यापैकी 122 जागा जिंकल्या होत्या. आता 164 जागा लढलो त्यापैकी 105 जागा जिंकल्या. सर्वात जास्त 12 महिला आमदार भाजपाच्याच आहेत.
शेड्युल कास्टचे आणि शेड्युल ट्राईबचे प्रत्यकी 9 आमदार भाजपाचे निवडून आले आहेत, असे पाटील यांनी सांगितले. 1990 नंतर कोणत्याच पक्षाला 100 जागांवर विजय मिळालेला नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे मिळूनही 100 आमदार यावेळी आलेले नाहीत. त्यामुळे सर्वच आघाड्यांवर विचार करता भाजपाच राज्यात क्रमांक एकचा पक्ष असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
शेतकऱ्याला मदत
अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्याला जास्तीत जास्त मदत कशी मिळू शकेल यावर बैठकीत विचार करण्यात आला. 23 हजार कोटींची पीकविम्याची रक्कम त्याला मिळवून देण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. प्रत्येकाने मतदारसंघात जाउन शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा द्यावा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.