पुणे – दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची एसटी, रेल्वे स्थानकासह महामार्गावरील थांब्यांवर मागील दोन दिवसांपासून मोठी गर्दी पहायला मिळत आहे. पर्यायाने पुण्यातून मुंबई, सातारा-कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक रोडवर वाहनांची ठिकाणी कोंडीही झाली होती.
शिवाजीनगर आणि स्वारगेट स्थानकावर गर्दी…
गावी जाण्यासाठी प्रवाशांची एसटीला मोठी पसंती असते. त्यामुळेच एसटीकडून यंदा प्रवाशांसाठी 515 जादा गाड्यांचे नियोजन केले. त्यानुसार खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे मैदान, वाकडेवाडी येथील स्थानक आणि स्वारगेट स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. मराठवाडा, विदर्भाकडे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल असून, जादा गाड्या सोडण्यात येत आहे. तर कोल्हापूर आणि सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्यांनाही मोठी गर्दी आहे.
रेल्वे स्थानक गर्दीने भरून गेले
लांब पल्लयाच्या प्रवास सुरक्षित आणि कमी खर्चात, यामुळे नागपूर, कोल्हापूर, जळगाव, अमरावती, भुसावळ, लातूर यासह महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या ट्रेनला प्रवाशांची मोठी गर्दी असते. मागील वर्षी पुण्यात रेल्वे स्थानकावर झालेल्या गर्दीत एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला होता. त्यामुळे यंदा या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा पथके नेमण्यात आली. तसेच प्रवाशांनी चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे विभागाकडून दानापूर, कोल्हापूर यासह विदर्भ आणि मराठवाड्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात आले आहे.
खासगी बस चालकांची शहरात एन्ट्री आणि कोंडी…
एसटी आणि रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी, आरक्षण फुल्ल असल्यामुळे गावी जायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर प्रवाशी खासगी बसकडे वळतात. त्यामुळे दरवर्षी खासगी बसचालकही प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, जादा गाड्यांचे नियोजन करतात. मात्र, काही ट्रॅव्हल्सवाल्यांकडून गर्दीचा फायदा घेत अधिक तिकिटदर आकारत प्रवाशांची लुट सुरू असते. विशेषत: लांब पल्ल्याच्या प्रवाशांत अशी लूट होते. तर काही ट्रॅव्हल्स ह्या शहरातून जात असल्यामुळे कोंडीत भर पडत आहे.
महामार्गावर ताटकळत उभे रहावे लागत आहे…
आरक्षण मिळाले नाही, ट्रेन, एसटीला मोठी गर्दी आहे. त्यापेक्षा महामार्गावर उभे राहून मिळेल त्या गाडीने जायचे या उद्देशाने शहराच्या चारही महामार्गावर ठिकठिकाणी प्रवाशांची गर्दी पहायला मिळत आहे. त्यामध्ये खासगी बस, भाडेतत्वावरील कॅब किंवा कार या गर्दीचा फायदा घेत कमाई करून घेतात. मात्र, हा प्रवास कितपत सुरक्षित हा देखील प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ही गर्दी पहायला मिळते.
यंदाची गर्दी नियंत्रणात…
मागील वर्षी दोन ते तीन सण एकाच दिवशी होते. त्यामुळे गावी जाणाऱ्यांची गर्दी एकाच वेळी सर्व स्थानकांवर झाली आणि रेल्वे आणि एसटी प्रशासनाची धांदल उडाली. यंदा वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हे वेगवेगळ्या दिवशी आले. त्यामुळे काही व्यक्ती हे वसुबारसपासून गावी जातात. तर लक्ष्मीपूजन झाल्यावर काही नागरिक फिरायला जातात. त्यामुळे यंदा गर्दी विभागली गेली आणि गाड्यांचे नियोजन करणेही सोपे केले, असे रेल्वे आणि एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.