– वंदना बर्वे
कॉंग्रेस पक्ष खरंच “इंडिया’ आघाडीची उपेक्षा करीत आहे काय? की कॉंग्रेस पक्ष आपलं गांभीर्य पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठरविणार आहे?
“इंडिया’ या आघाडीचं एकच लक्ष्य आहे ते म्हणजे भाजपविरोधी मतांचं विभाजन होऊ द्यायचं नाही. अर्थात, भाजपविरोधी मतांचं विभाजन झालं नाही आणि ती सर्व मतं एकाच उमेदवाराला पडलीत, तर भाजपचा पराभव करणे शक्य होणार आहे. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकजूट झालेले विरोधी पक्ष विधानसभेच्या निवडणुकीतच पोळा फुटल्यासारखं वागू लागले आहेत. विरोधी पक्षात खरंच फूट पडली तर सर्व पक्ष आपला उमेदवार उभा करतील आणि भाजपविरोधी मतांचं विभाजन झाल्याशिवाय राहणार नाही.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अलीकडेच “इंडिया’ आघाडीच्या वास्तविक परिस्थितीवर एक भाष्य केले होते. “कॉंग्रेस पक्ष आघाडीबाबत गंभीर नाही’, असं भाष्य त्यांनी केलं होतं. तसं बघितलं तर या भाष्यावर आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण, या आघाडीप्रती ज्या प्रकारचं गांभीर्य कॉंग्रेसकडून अपेक्षित होतं तसं दिसून येत नाही आहे.
दुसरीकडं, मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षात जुंपली आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. एवढंच नव्हे तर, दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उतरविले आहेत. लक्ष्य काय होतं आणि काय सुरू आहे, याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. लक्ष्य होतं इंडिया आघाडीतील पक्षांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात सर्वांनी मिळून एकच उमेदवार उतरविण्याचं, मात्र भाजप लांबच राहिला आघाडीतील पक्षांनीच एकमेकांविरुद्ध उमेदवार उतरविलेत.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या म्हणण्यानुसार, कॉंग्रेसने त्यांना सहा जागां देण्याचे आश्वासन दिले होते. ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी यादव यांची चर्चासुद्धा झाली होती. परंतु, कॉंग्रेसने एकही जागा सोडली नाही. यामुळे यादव नाराज झाले. परंतु, 2024 च्या निवडणुकीत विरोधी पक्षांपुढे “जिंका किंवा मरा’ अशी परिस्थिती असेल तर आघाडीतील सर्व पक्षांनी गांभीर्य दाखविणे अपेक्षित होतं.
कॉंग्रेसनं सपासाठी सहा जागा सोडल्या असत्या तर निकालावर काही खूप मोठा परिणाम झाला असता असं अजिबात नव्हे. याउलट, इंडिया आघाडीची वज्रमूठ दिसून आली असती. आघाडीत मजबुती येत असल्याची चर्चा देशात झाली असती. परंतु, दुर्दैवाने तसं घडलं नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी मैदानात उतरला असून तो भाजपसह कॉंग्रेसचाही समाचार घेत आहे. नितीशकुमार, अखिलेश यादव यांच्याप्रमाणे कॉंग्रेसविरोधात विधाने करताना दिसत नसले तरी त्यांच्या मनाची स्थिती सुद्धा यादव यांच्यासारखीच असेल यात शंका नाही.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत चालली असल्याचा दावा कॉंग्रेसच्या रणनीतिकारांकडून केला जात आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर कॉंग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबातील अन्य सदस्यांना असं वाटतं आहे की, नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि भाजप या दोघांच्या विरोधात लोकांमध्ये खूप नाराजी आहे. याचा फायदा कॉंग्रेसला मिळू शकतो. कॉंग्रेसच्या या आत्मविश्वासाची झलक आघाडीच्या पाटण्यातील पहिल्या बैठकीतही बघायला मिळाली होती. यानंतर बंगळुरूच्या बैठकीचं यजमान पद तर कॉंग्रेसकडेच होतं.
परंतु, मुंबईतील बैठक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आयोजित केली असली तरी अग्रभागी फक्त कॉंग्रेसच दिसून येत होती. 2014 आणि 2019 अशा लोकसभेच्या दोन निवडणुकांत पराभूत झाल्यानंतर कॉंग्रेसचा आत्मविश्वास कमी झाला असेल असे घटक पक्षांना वाटत होतं. यामुळे कॉंग्रेस थोडं वाकून चालेल असा त्यांचा समज झाला होता. परंतु, सगळं काही उलट होत आहे. कदाचित या गोष्टीमुळे नितीशकुमार आणि अखिलेश यादव अस्वस्थ झाले असावेत.
कॉंग्रेस लोकसभेच्या दोन्ही निवडणुकीत पराभूत झाली असली तरी आजही देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसचेच नाव घेतले जाते. कारण सर्व राज्यात अस्तित्व आहे. लोकसभेत सर्वात जास्त खासदार याच पक्षाचे आहेत. अशात, आपण नेतृत्वस्थानी आहोत असं कॉंग्रेसला वाटत असेल तर विरोधी पक्षांनी वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. मध्यप्रदेशच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि सपा वेगवेगळी लढत आहे केवळ हीच बाब इंडिया आघाडीत फूट पडली असल्याचं दाखविणारी नाही. तर अनेक गोष्टींमुळे आघाडीत एकवाक्यता किंवा दिलजमाई झाली असं दिसून येत नाही. केजरीवाल यांना “ईडी’ची नोटीस मिळाली. इंडिया आघाडीने यावर एकमुखाने प्रतिक्रिया व्यक्त करायला हवी होती. परंतु, एकाही पक्षाने तोंड उघडलं नाही.
आपलं तृणमूल कॉंग्रेसशी जमणार नाही, असं डाव्या पक्षांनी सरळ सांगितलं आहे. अर्थात, तृणमूल आणि डावे पक्ष लोकसभा एकजुटीने लढणार नाहीत. अशात, कॉंग्रेस आणि डाव्यांची आघाडी झाली तरी ती तृणमूल कॉंग्रेसच्या विरोधात होईल. अशात, कॉंग्रेस-डावे, भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस अशी तिहेरी लढत बघायला मिळेल. सध्या, कॉंग्रेस आणि सपामध्ये जे काही सुरू आहे त्यावरून आघाडीत सर्व काही अलबेल नाही असे दिसून येत आहे. परंतु, आघाडी विधानसभेसाठी नव्हे तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी आहे असा तर्क दिला जात आहे. परंतु, ही बाब आघाडीच्या बैठकीत स्पष्ट करायला हवी होती. असे झाले असते तर आघाडीत फूट पडली अशी चर्चा रंगली नसती.
मुळात, भाजपला पराभूत करायचं आहे असं सर्वच पक्षांना वाटतं. परंतु, या पक्षांमध्ये मनाचा मोठेपणा आणि व्यापक दृष्टिकोन याचा अभाव दिसून येतो. विचारधारेच्या लढाईत छोटे राजकीय हितसंबंध कधीच आडवे येत नाहीत. परंतु, “इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी विचारांपेक्षा पक्षाचे हित आणि स्वतःचे हित मोठे मानले तर आघाडीचे लक्ष्य कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. याबाबत आघाडीतील पक्ष येत्या काळात कोणती भूमिका घेतात? त्यावरूनच काय ते स्पष्ट होईल.