देऊळगावराजे -बोरीबेल (ता. दौंड) परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे हाताशी आलेली पिके सडून गेली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. येथील एका शेतकऱ्याचे तोडणीस आलेले सात ते आठ एकर खरबूज, टोमॅटो पीक पावसामुळे सडून गेले आहे.
यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दौंड तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यात येत आहे. मात्र, महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारचे पंचनामे सुरू झालेले नाहीत.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावातील पिके, पॉलिहाउस जमीनदोस्त झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सुरुवातीला कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
राज्य शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरीवर्गातून पुढे येत आहे. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शिरापूर, देऊळगावराजे, आलेगाव, खोरवडी, बोरीबेल, काळेवाडी, वडगाव, पेडगाव आदी गावातील पिके जमीनदोस्त झाली आहेत.
अनेक ठिकाणी शेतातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहात आहे. कांदा, ऊस, कलिंगड, खरबूज, टोमॅटो, ज्वारी, बाजरी, ढोबळी, मिरची, मका आदी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
भरपाईची मागणी
अगोदर कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. निसर्गाच्या लहरीपणा, पाऊस यामुळे प्रत्येकवेळी शेतकऱ्यांनाच झळ सोसावी लागत आहे. यामुळे राज्य शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.