करोना मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना
पुणे – जेथे स्वत:च्या नातेवाईकांविषयीची कृतज्ञता, प्रेम, वात्सल्य खुंटते आणि पोटच्या पोरांची साथ संपते…तेथे खांदा देऊन मोक्षाप्रत नेण्यासाठी तयार असतात ते अरुण जंगम आणि त्यांचा मुलगा अभिषेक. तसेच त्यांचे 12 सहकारीही. नातेवाईकांनी स्मशानभूमीच्या दारात सोडून गेलेल्या तसेच करोनाबाधित मृतकांवर गेल्या तीन महिन्यांपासून ते अंत्यसंस्कार करत आहेत. “आता करोना मृतांवर अंत्यसंस्कार करून आमची भीती मेली आहे,’ अशी भावना ते व्यक्त करतात.
सध्या आपल्याला किंवा नात्यात कोणाला करोना झाला, ही गोष्टच झोप उडवणारी ठरत आहे. यातच जर करोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे कामच एक कुटुंब करत आहे, असे समजल्यास त्यांना येणारे अनुभव काय असतील, याचा विचार न केलेलाच बरा.
अरुण आणि त्यांचा मुलगा अभिषेक हे गेल्या तीन महिन्यांपासून येरवडा आणि कैलास स्मशानभूमीत करोना बाधितांवर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत सुमारे चारशेपेक्षा जास्त बाधित मृतकांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. “हे काम करण्याला आम्ही वडिलांना विरोध केला. परंतु त्यांनी हे काम सुरूच ठेवले. मग मीही मदतीला जाऊ लागलो.
मृतकांच्या नातेवाईकांचे अनुभव डोळ्यांत पाणी आणणारे असतात,’ असे 23 वर्षीय अभिषेक सांगतो. “करोनामुळे मृत पावलेल्या आप्ताचा चेहरा पाहण्याचा हट्टही आम्ही अनुभवला आहे. पण, पॅक केलेले पार्थिव उघडता येत नाही. त्यामुळे त्यांचा हा हट्ट पुरवणे शक्य होत नाही. त्यावेळी त्यांना समजावण्याचेही काम आम्ही केले आहे. तीन पाळ्यांमध्ये प्रत्येकी चार असे 12 जण आम्ही येथे रात्रंदिवस काम करतो. मृतांचा आकडा जास्त असतो, त्यादिवशी वडील, मी रात्रीही येथे थांबतो,’ असे अभिषेकने सांगितले.
ओसरलेल्या मातृप्रेमाची शोकांतिका…
एक वृद्धा…करोनाने बाधित झाली. तिला एका रुग्णालयात मुलांनी दाखल केले. मधुमेह, रक्तदाब असेही आजार तिला आधीच होते. त्यातून करोनाने तिचा जीव घेतला. तिचा मृत्यू झाल्याची वार्ता तिच्या मुलांना रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. त्यांनी ती ऐकली आणि रुग्णालयालाच सांगितले की, “तुम्हीच तिचे पार्थिव स्मशानभूमीत पोहोचवण्याची व्यवस्था करा. आम्ही येऊ शकणार नाही. ‘रुग्णालयाने वारंवार मुलांना संपर्क केला, परंतु “आता तुम्ही आणखी कॉल कराल, तर आम्ही फोन बंद करून ठेवू’ अशी धमकी वजा भाषा वापरण्यात आली, असे अरुण जंगम आणि अभिषेक यांनी सांगितले.
मार्च, एप्रिलमध्ये सुरुवातीला अतिशय कटू अनुभव आले. लॉकडाऊन होते आणि करोनाविषयी लोकांच्या मनात खूपच भीती होती. त्यावेळी अनेक नातेवाईक ऍम्ब्युलन्सबरोबरच पास आणि कागदपत्रे पाठवत असत. स्वत: येथे येण्याचे धाडस दाखवत नसत. काहीजण तर अंत्यसंस्कार होईपर्यंतही थांबण्याचे “सौजन्य’ दाखवत नव्हते.
– अभिषेक जंगम, विद्युत दाहिनीची देखभाल करणारा