सातारा -एखाद्या माणसाने जी विकासकामे केली, त्यावरून त्याची राजकीय उंची ठरवली जाते. गेल्या तीन दशकाच्या राजकारणात समाजकारणाद्वारे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकासकामांना मी प्राधान्य दिले आहे. उदयनराजे केवळ तोंडाच्या वाफा सोडणारा माणूस नाही. जे विकासकामांवर टीका करतात, त्यांनी स्वतः काय केले याचे आत्मपरीक्षण करावे, असा अप्रत्यक्ष टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता लगावला.
येथील कनिष्क मंगल कार्यालयात सातारा विकास आघाडी सुसंवाद अभियानांतर्गत उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सर्वांशी संवाद साधला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, किशोर शिंदे, निशांत पाटील, वसंत लेवे, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, संग्राम बर्गे, संजय पाटील, स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, अनिता घोरपडे आदी उपस्थित होते.
खासदार उदयनराजे म्हणाले, “ज्या वेळेला मी माझ्या समाजकारणाची साताऱ्यातून सुरुवात केली, त्यावेळेला साताऱ्याचा बायपास रस्ता नव्हता. समाजकारणातून सर्वसामान्यांचा विकास हे माझ्या कामाचे सूत्र होते. गेल्या तीन दशकाच्या वाटचालीत साताऱ्यात जास्तीत जास्त विकासकामे करून सातारा शहराला उन्नत स्थान देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. साताऱ्यात येणाऱ्या नव्या पिढीला नवीन कामांच्या संधी दिल्या पाहिजेत. यासाठी सातत्याने रोजगार मेळाव्यांचे आयोजन होत आहे.
एखादा जो कोणी पदावर बसतो आणि कामे करत नाही त्याची त्या पदावर बसण्याची लायकी नसते. उदयनराजे मात्र विकासकामे करताना तोंडाच्या वाफा सोडत नाही. वीस वर्षांपूर्वी साताऱ्यात आलो तेव्हा मूलभूत सुविधांची प्रचंड अडचण होती. मात्र आज सातारा विविध विकासकामांनी युक्त असा आहे. जे नावे ठेवतात त्यांनी ती जरूर ठेवावी, मात्र आपण काय काम केलं, हे स्वतःला अगोदर विचारावे.
उदयनराजे पुढे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये त्यांनी लोक सहभागातून राज्यकारभाराची सुसूत्रता राबवली. तो प्रामाणिक प्रयत्न सध्याच्या प्रशासनामध्ये असणे गरजेचे आहे. सातारा एमआयडीसीची स्थापना होऊन इतकी वर्ष झाली, तरी त्याचा विकास का झाला नाही? छत्रपती शाहू स्टेडियम साताऱ्यात असतानाही तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने भरू शकत नाहीत, ही शोकांतिका आहे अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
संग्राम बर्गे म्हणाले, विलासपूर सारख्या नव्याने सातारा पालिकेच्या हद्दीत आलेल्या क्षेत्रात तब्बल साडेपाच कोटींची विकासकामे उदयनराजे यांच्या माध्यमातून सुरू आहेत. महाराज साहेब आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. आपण एक मुखाने सातारा पालिकेच्या निवडणुकीची तयारी करूया अशी ठाम ग्वाही शिरीष चिटणीस यांनी दिली.