वाई – ‘काशिनाथाचं चांगभलं’च्या जयघोषात पारंपरिक वाद्यांच्या गजरात बावधन येथील ग्रामदैवत भैरवनाथाची बगाड यात्रा मोठय़ा उत्साहात पार पडली. गावचे वतनदार खासदार उदयनराजे भोसले यांनी आज काही वेळ बगाड रथाचे सारथ्य केले, हे यावर्षीच्या यात्रेचे वैशिष्ट्य राहिले.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिध्द बगाड यात्रा दरवर्षी माघ वद्य पंचमीला (रंगपंचमी) होते. बगाड म्हणजे दगडी चाके असलेला रथ. त्यावर किमान वीस पंचवीस फूट उंचीचे सागवानी खोड घासून जाड खांबाच्या आकारात उभे करण्यात येते. त्यावर दोन्ही बाजूला गावातील बुजुर्गाच्या सल्ल्याने कळकाचे व पारंपरिक झाडाचे मोठय़ा आकाराचे शिड बांधण्यात येते.
त्यावर गावच्या मानकऱ्यांना बसण्याचा मान असतो. त्याचबरोबर गावातील भैरवनाथ मंदिरात होळी पौर्णिमेस ज्याच्या बाजूने कौल मिळतो अशा बगाडय़ास शिडावर चढविण्यात (बांधण्यात) येते. यावर्षीचा बगाडय़ा विकास तानाजी नवके याच्याकडून कृष्णा तीरावरील सोनेश्वर येथे सकाळी साडेनऊच्या दरम्यान भैरवनाथ व ग्रामदैवतांची पूजा झाल्यावर सकाळी साडेदहाच्या सुमारास बगाडास बैल जुंपण्यात आले. बगाडाच्या मागे वाजतगाजत ग्रामदैवताच्या पालख्या असतात.
बगाडाच्या रथास एका वेळी किमान दहा जे बारा बैल जुंपण्यात येतात. बैलांच्याव्दारे बगाड ओढून गावात आणले जाते. बावधन गावात बगाड येईपर्यंत शिवाराप्रमाणे बैल जोडय़ा बदलण्यात येतात. त्यामुळे गावातील सर्व समाजांना व भावकींना बगाड ओढण्याचा मान मिळतो. कोणताही भाडणतंटा राहत नाही.
बगाड दुपारी तीनच्या सुमारास शेतशिवारातून पक्क्य़ा रस्त्यावर आले. पाचच्या दरम्यान वाई सातारा रस्त्यावर आले आणि सातच्या दरम्यान बावधन गावात पोहोचले. यावर्षी गावचे वतनदार खासदार उदयनराजे भोसले यांनीही काही वेळ बगाड रथाचे सारथ्य केले. त्यावेळी गावकरी व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आज किमान एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी बगाडाचे दर्शन घेतले. रस्त्याला खाऊ गल्लीचे स्वरूप आले होते.
वाईचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम व पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी, दंगाविरोधी पथक यांच्या सहकार्याने चाेख बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. बावधन ग्रामस्थ, तरूण कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मिरवणूक यशस्वी पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला.