महावितरणचा आंदोलकांना इशारा
पुणे – करोनाकाळातही वीजग्राहकांच्या सेवेत अहोरात्र कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते, कर्मचारी सध्या गंभीर आर्थिक संकटामुळे नाईलाजाने थकीत वीजबिलांची वसुली व थकबाकीदारांची वीज खंडित करण्याची कारवाई करीत आहेत. यादरम्यान त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की किंवा मारहाण तसेच कार्यालयांची तोडफोड करून नासधूस झाल्यास तत्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा कार्यालयाची तोडफोड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, इचलकंरजी (जि. कोल्हापूर) येथील महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींना न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
तसेच, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांशी मोबाइलद्वारे थेट संवाद साधून त्यांची विचारपूस केली असून असे प्रकार या पुढे रोखण्यासाठी थेट फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.