मुंबई : भारतीय महिला क्रिकेट टीमची माजी कर्णधार आणि भारताची दिग्गज महिला खेळाडू मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मितालीने भारतासाठी २३ वर्षे क्रिकेट खेळले आणि महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. याबाबतचे ट्विटही तिने केले आहे.
Thank you for all your love & support over the years!
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u— Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
मितालीने बुधवारी सोशल मीडियावर एक संदेश जारी करून बीसीसीआय आणि सर्व चाहत्यांचे आभार मानत ही माहिती दिली. मितालीने लिहिले आहे की “इतक्या वर्षांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आता मी माझ्या आयुष्यातील दुसऱ्या इनिंगची वाट पाहणार आहे आणि त्यासाठीही तुमच्या प्रेमाची आणि साथ असण्याची गरज आहे” .
देशासाठी खेळणे मोठा सन्मान
मितालीने तिच्या भावनिक संदेशात लिहिले की, मी लहान मुलीच्या रुपात ब्लू जर्सीमध्ये माझी सेवा सुरू केली. आपल्या देशासाठी खेळणे यापेक्षा मोठा सन्मान कोणताच असू शकत नाही. माझा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता आणि प्रत्येक प्रसंगाने मला काहीतरी नवीन आणि वेगळे शिकवले. गेली २३ वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी, आव्हानात्मक आणि मजेदार वर्षे आहेत.
मितालीचे क्रिकेट करिअर
26 जून 1999 रोजी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मिताली राजने 27 मार्च 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला. यादरम्यान तिने 12 कसोटी, 232 एकदिवसीय आणि 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. मितालीने कसोटीत 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 699 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने 7 शतके आणि 64 अर्धशतकांसह 7805 धावा जोडल्या आहेत . T20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर मितालीने 17 अर्धशतकांसह 2364 धावा केल्या आहेत.