मुंबई :- भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे.विश्वकरंडक स्पर्धा म्हटली की, भारत विरुध्द पाकिस्तान सामना केव्हा असणार याकडेच साऱ्या भारतीय चाहत्यांचे लक्ष लागलेले असते. त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात फक्त आयसीसी स्पर्धेतच लढत होते. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी चाहते हजारो, लाखो रुपये खर्च करतात.
व्हीआयगोगो या संकेतस्थळावर परंपरागत प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला होत असलेल्या सामन्याचे सर्वात उच्च श्रेणीच्या तिकीटांची विक्री तब्बल 56 लाख रुपयांना केली गेली. या संकेतस्थळावर सर्वात साध्या श्रेणीचे तिकिटही तब्बल 80 हजार रुपयांच्या घरात आहे.
बुक माय शो या संकेतस्थळावरील या सामन्याची तिकिटे तर यापूर्वीच विकली गेली आहेत. या प्रचंड किंमतीच्या तिकिटांवरून आता चाहत्यांनी बीसीसीआय व आयसीसीवर कडाडून टीका केली आहे. ही तिकिटे केवळ गर्भश्रीमंतांसाठीच विक्रीला ठेवली आहेत का? सर्वसामान्य व्यक्तींच्या आवाक्याबाहेर या किंमती आहेत. 56 लाख रुपयांचे एक सामना पाहण्याची तिकिट घेण्यापेक्षा एखाद्या शहरात स्वतःचे एक घर विकत घेता येइल, अशा शब्दात चाहत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्याचवेळी टीम इंडिया 8 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक
– 8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
– 11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
– 14 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
– 19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
– 22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
– 29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनौ
– 2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
– 5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
– 12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलॅंड, बेंगळुरू
त्यानंतर 11 ऑक्टोबरला भारत आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने असतील. यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ 14 ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.