– अमित डोंगरे
भारत व वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू होत आहे. खरेतर गेल्या दशकापासून भारतीय संघाचे वर्चस्व राहिलेले असले तरीही यंदाची मालिका फलंदाज केंद्रित राहणार यात शंका नाही. वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या या पूर्वीसारख्याच वेगवान गोलंदाजांची पाठराखण करणाऱ्याच असणार यातही शंका नाही. मात्र, गेल्या दोन दशकांत भारतीय संघाने कॅरेबियन भूमीवर पाच कसोटी मालिका खेळल्या असून त्यातील 4 जिंकल्या आहेत.
2002 सालानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका गमावलेली नाही. 2019 साली या दोन संघात अखेरची कसोटी मालिका झाली होती व ती भारतीय संघाने जिंकली होती. मात्र, आता हा इतिहास झाला त्यामुळे यंदाची मालिका बाकी सारे माग ठेवत भारतीय संघाला खेळावी लागणार आहे.
या मालिकेत सर्वात प्रभावी घटक फलंदाजांची कामगिरी हाच राहणार आहे. दोन्ही संघाची गोलंदाजीची बाजू पाहता त्यात बरेचसे साम्य आहे. मात्र, फलंदाजीत भारतीय संघ जास्त सशक्त दिसतो. अर्थात, हा सशक्तपणा प्रत्यक्ष सामन्यात दिसला तरच त्याचा उपयोग आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल व उपकर्णधार अजिंक्य राहाणे हे सध्याचे भारतीय फलंदाजीचे सर्वात दिग्गज फलंदाज मानले जात आहेत.
त्याचवेळी गिल व राहाणे वगळता रोहित व कोहली तंत्रात कमी पडत असल्याचे चित्र गेल्या दोन मोसमांपासून सातत्याने दिसत आहे. या दोघांनी जर संघाचा प्रमुख भार आपल्या खांद्यावर वाहिला तरच नवोदितांना आत्मविश्वास मिळेल व रहाणेसह सगळेच फलंदाज भरात येऊन फलंदाजी करतील. रोहित व कोहली अनेकदा स्थिरावलले असतानाच बाद होताना दिसतात. रोहित पूल शॉट खेळताना तर कोहली आऊट साइड ऑफ स्टम्पवर पडलेले चेंडू खेळताना अनेकदा बाद झालेले आहेत. यावर त्यांनाच उपाय शोधून काढावा लागणार आहे.
वेस्ट इंडिजचा संघ यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धत पात्र ठरू शकलेला नाही, त्यामुळे सध्या त्यांच्या संघावर चोहोबाजूने टीका सुरू आहे. त्यांनीही जे घडले ते विसरून या मालिकेत उतरण्याचा पक्का इरादा केला आहे. संघात काही नवे चेहरेही आहेत. मात्र, तरीही ते बलाढ्य भारतीय फलंदाजीला रोखतील का, हा प्रश्न आहे. भारतीय संघाने त्यांच्या याच नवखंपणाला लाभ घेतला तर या मालिकेतील विजयापासून भारतीय संघाला कोणीही रोखू शकणार नाही. सराव तर भारतीय खेळाडू कसून करत आहेत फक्त त्याचा लाभ प्रत्यक्ष मैदानावर होताना दिसला पाहिजे हीच अपेक्षा आहे.