– अमित डोंगरे
बीसीसीआयची हाव कधी संपणार हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून विचारला जात आहे. मात्र, त्यावर समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेले नाही. एक संघ इंग्लंडला पाठवला तर दुसरा संघ श्रीलंकेत म्हणजे पाचो उंगलिया घी में. पण या सगळ्या पैशांच्या खेळात जीव मात्र खेळाडूंचा धोक्यात आला आहे.
जगभरात करोनाचा धोका सातत्याने डोके वर काढत असतानाच या स्पर्धा खेळवल्या जात आहेत. केवळ क्रिकेटच नव्हे तर टोकियो ऑलिम्पिकही याच काळात होत आहे. काही देशांत करोनाचा धोका अत्यल्प असला तरीही या स्पर्धांमुळे पुन्हा एकदा उद्रेक होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. ऑलिम्पिक असो किंवा क्रिकेट दोन्हीकडे हा धोका सारख्याच पातळीवर आहे. अर्थात त्याचे कोणालाही भान नाही आणि कर्तव्यही नाही. श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिकाही रविवारपासून सुरू झाली. सामने खेळवले गेले तर खेळाडूंची मानसिकताही सकारात्मक राहील, असा शोध बीसीसीआय व श्रीलंका क्रिकेट मंडळाने लावला आहे यावर काय बोलणार.
पण तुमचा खेळ होतो जीव मात्र, आमचा जातो हे एकदा तरी सगळ्या खेळाडूंनी एकत्र येत सांगायला काय हरकत आहे. संघातील स्थान जाईल आणि अन्य खेळाडूची वर्णी लागेल ही भीती असते, त्यामुळे खेळाडू करोनाचा धोका असताना काय किंवा गंभीर दुखापत झालेली असताना काय, मूग गिळून गप बसतात आणि म्हणूनच या क्रीडा संघटनांचे व संस्थांचे फावते.
इंग्लंड संघातील काही खेळाडू करोनाबाधित आढळले व त्याचे लोण श्रीलंका संघातही पोहोचले. त्यामुळे इंग्लंडने पाकिस्तान तसेच भारताविरुद्ध नव्या खेळाडूंना सहभागी करत खेळण्याचे धोरण अवलंबिले आहे.
भारतीय संघाचे ऋषभ पंत व वृद्धिमान साहादेखील बाधित झाल्याने आता आपल्या संघातही काही बदल केले जाण्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजे काय तर खेळाडूंची कोणालाही पडलेली नाही केवळ स्व हितं ध्येयम, हेच सूत्र हाती घेतले जात आहे.
प्रत्येक वेळी मास्क वापरू शकत नाही, असा युक्तिवाद सौरव गांगुलीने करून या मालिका तसेच स्पर्धा आयोजित करण्यात कीहीही गैर नाही असेच चित्र निर्माण केले आहे. आता चूक कोण व बरोबर कोण तसेच काय केले पाहिजे व कोणी हे प्रश्न बिनकामाचेच ठरतात.
मात्र, एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की, हा अट्टहास खेळाडूंच्या जिवावर उठणार आहे आणि ते थांबवण्याची कोणालाही इच्छा दिसत नाही हेच सर्वांत भयानक आहे. जीव महत्त्वाचा, की स्पर्धा याचा कधी तरी विचार केला जाणार का, हाच काय तो प्रश्न आहे.