कोलंबो – सलामीवीर पृथ्वी शॉ याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीनंतर कर्णधार शिखर धवन, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्या सहजसुंदर अर्धशतकी खेळीच्या जोरावर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 7 गडी राखून सहज पराभव केला व मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
श्रीलंकेने उभ्या केलेल्या 263 धावांचे आव्हान भारताने केवळ 3 गडी गमावून पूर्ण केले. भारताच्या डावाची सुरुवात केल्यावर शॉ याने अवघ्या 24 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 43 धावांची खेळी केली. त्याने धवनच्या साथीत संघाला अर्धशतकी सलामी दिली. तो बाद झाल्यावर धवन व किशन ही जोडी जमली. किशनने पदार्पणाचा सामना खेळताना 42 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 59 धावांची खेळी केली. धवनने किशनच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 85 धावांची भागीदारी केली. किशन बाद झाल्यावर धवनने मनीष पांडेच्या साथीत विजयाकडे वाटचाल केली.
दरम्यान, धवननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. पांडे मात्र स्थिरावल्यावर 26 धावांवर बाद झाला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी केली व संघाचे द्विशतक फलकावर लावले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने धवनला साथ देत विजय साकार केला. धवनने नाबाद 86 धावांची खेळी करताना 95 चेंडूत 6 चौकार व एक षटकार फटकावले. त्याला सुरेख साथ देताना यादवने 20 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावांची खेळी केली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 48 धावांची अखंडित भागीदारी केली व संघाचा विजय साकार केला. श्रीलंकेकडून धनंजय डीसील्व्हाने 2, तर लक्षण संदकनने 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, चामिका करुणारत्नेने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे यजमान श्रीलंकेला भारताविरुद्ध 9 बाद 262 धावा उभारता आल्या. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला वातावरणाचा लाभ घेता आला नाही. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी 49 धावांची सलामी दिली.
मात्र, त्यानंतर त्यांचे गडी ठरावीक अंतराने बाद होत गेले. त्यांच्या फलंदाजांना उपयुक्त खेळी करता आल्या. मात्र, या खेळीचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात अपयश आले.
एकवेळ श्रीलंकेचा संघ द्विशतकी धावा करेल का अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, तळात चामिका करुणारत्नेने अविश्वसनीय आक्रमक फलंदाजी करत श्रीलंकेला अडीचशे धावांच्या पुढे नेले. त्याने 43 धावांच्या खेळीत 35 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार व 2 षटकार फटकावले.
डावाच्या सुरुवातीला अविष्का फर्नांडोने 32, तर मिनोद भानुकाने 27 धावा केल्या. ते बाद झाल्यावर भानुका राजपक्षाने 24 धवांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर चहल व यादव यांनी श्रीलंकेच्या मधल्या फळीवर वर्चस्व राखले. या जोडीने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवताना प्रत्येकी दोन गडी बाद केले. मात्र, चरिता असालंका व कर्णधार दासुन शनाका यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. असालंका 38, तर शनाका 39 धावांवर बाद झाल्यावर त्यांचा डाव पुन्हा एकदा गडगडला. त्याचवेळी चामिका करुणारत्नेने भारताच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला व संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. भारताकडून चहल, यादव व चहर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. हार्दिक पंड्या व कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
धवन ठरला सर्वांत वयस्कर कर्णधार
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला रविवारपासून सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर जमा केला. 35 वर्षे 225 दिवस वय असताना त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले. आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे नेतृत्व करणारा सर्वांत वयस्कर खेळाडू धवन ठरला आहे. यापूर्वी हेमू अधिकारी यांनी 1959 साली वेस्ट इंडीजविरुद्ध कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती तेव्हा त्यांचे वय 39 वर्षे 190 दिवस होते.
संक्षिप्त धावफलक :
श्रीलंका – 50 षटकांत 9 बाद 262 धावा. (दासुन शनाका 39, चरिता असालंका 38, अविष्का फर्नांडो 32, मिनोद भानुकाने 27, भानुका राजपक्षा 24, चामिका करुणारत्ने नाबाद 43, दुष्मंता चामिरा 13, दीपक चहर 2-37, कुलदीप यादव 2-48, यजुवेंद्र चहल 2-52, कृणाल पंड्या 1-26, हार्दिक पंड्या 1-33). भारत – 36.4 षटकांत 3 बाद 263 धावा. (पृथ्वी शॉ 43, इशान किशन 59, मनीष पांडे 26, शिखर धवन नाबाद 86, सूर्यकुमार यादव नाबाद 31, धनंजय डीसील्व्हा 2-49, लक्षण संदकन 1-53).