– अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धेततील संघांची संख्या 8 वरून 10 केली. त्यात गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट्स हे दोन संघ नव्याने दाखल झाले. मात्र, गेल्या काही वर्षात काही संघांची कामगिरी पाहता ही संख्या वाढवण्याऐवजी कमी करावी असेच वाटते. संख्या वाढवण्यापेक्षा गुणवत्ता टिकावी हा मूळ हेतू ठेवला तर केवळ भारतीय संघालाच नव्हे तर जगभरातील देशांना नवोदित व होतकरू सेकंड बेंच मिळेल.
आतापर्यंत 15 स्पर्धा झाल्या असून आता यंदाची 16 वी स्पर्धा सुरू आहे.
त्यात सर्वात जास्त पाच वेळ मुंबई इंडियन्स जिंकली आहे तर चार वेळा चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद प्राप्त केले आहे. मात्र, विराट कोहलीसारख्या मातब्बर खेळाडूच्या रॉयल चॅलंजर बंगळुरूला तसेच पंजाब किंग्जला व दिल्ली कॅपिटल्सला आजवर एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
त्यातही ज्या संघांनी एकदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे त्या राजस्थान किंवा हैदराबाद संघालाही त्यानंतर साजेसा खेळ करता आलेला नाही. एखाद दुसरा सामना वगळला तर त्यांचा खेळ पाहून या संघाला स्पर्धेत का ठेवले आहे, असाच प्रश्न निर्माण होत आहे.
राजस्थानने स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी विजेतेपद पटकावले.
हैदराबादनेही 2016 साली हा मान मिळवला. त्यानंतर गेल्या वर्षापासून नव्याने दाखल झालेल्या गुजरातनेही पदार्पणातच ही करामत करून दाखवली. मात्र, बंगळुरू, दिल्ली किंवा पंजाबसारखे असे काही संघ आहेत की ज्यांच्याकडे दिग्गज खेळाडू असूनही त्यांना कधी यश मिळाले नाही.
याउलट संघांची संख्या कमी केली व संघ मालकांना रकमेची पर्स वाढवून दिली तर त्यांच्याकडे जास्त पर्याय उपलब्ध होतील व गेली 16 वर्षे अपयशी ठरत असलेल्या संघातील एकापेक्षा एक सरस खेळाडू अन्य संघांकडून खेळताना दिसतीलच; परंतु त्यांच्याच कामगिरीमुळे ते संघ विजेतेपदही मिळवताना दिसतील.
आज एका संघात किमान तीस खेळाडू आहेत तसेच राखीव खेळाडूंचा वेगळा बेंचही आहे त्यांना कधी संधी मिळणार. नवोदितांना जर वेळेवर संधी मिळाली नाही तर ते केवळ आयपीएल टू आयपीएल खेळताना दिसतील किंवा याच स्पर्धेत पुढील कित्येक काळ बेंचवरच बसलेले दिसतील. काही वरिष्ठ परंतु सतत अपयशी ठरत असलेल्यांना नारळ दिल्याशिवाय जागा रिक्त होणार नाहीत. क्वालिटीला प्राधान्य दिले गेले पाहिजे क्वांटीटीला नव्हे.