-अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धेने त्याला ओळख दिली. नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यानेही त्याची जबाबदारी समर्थपणे पेलली; पण तरीही केवळ काही गोष्टी जुळून आल्या नाहीत म्हणून त्याच्या पंजाब संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
लोकेश राहुल याच्याबाबत बोलत आहोत. किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार, या स्पर्धेतील सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज, संघाला घट्ट बांधून ठेवत किमान क्षमता असलेल्या खेळाडूंकडून कमाल कामगिरी करून घेणारा समर्थ सहकारी अशा कितीतरी भूमिका त्याने यंदाच्या स्पर्धेत वठवल्या. एखाद्या चित्रपटाची कथा असावी तशी कामगिरी त्याच्यासह संपूर्ण पंजाब संघाने केली. मात्र, क्लायमॅक्समध्ये हिरोच अपयशी ठरवा असे काहीतकी घडले व स्पर्धेत सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संघाला स्पर्धेतून बाद व्हावे लागले. कमनशीब म्हणायला हवे दुसरे काय.
पंजाब संघ यंदाच्या स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यांपासून फॉर्ममध्ये होता. संघात काय नव्हते. एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज होते. गोलंदाज अननुभवी पण प्रामाणिक प्रयत्न करणारे होते. एक महंमद शमी वगळता अन्य खेळाडू आखातात फारसे खेळलेही नव्हते. तरीही संघाने खूप मोठी मजल मारली. युवराजसिंग किंवा वीरेंद्र सेहवाग यांच्या इतका राहुल मोठा नाही असे सर्व म्हणत होते. मात्र, तरीही त्याच्याकडे नेतृत्व दिले गेले. त्यानेही आपल्या अथक मेहनतीच्या जोरावर युवराज व सेहवाग यांच्याकडूनच वारसा घेतल्यासारखा एक फलंदाज म्हणून यशस्वी तर झालाच पण एक आक्रमक नेतृत्व करणारा संघनायक म्हणूनही यशस्वी ठरला.
त्याच्या याच कर्तबगारीमुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे उपकर्णधारपदही देण्यात आले. अनेकांनी नाके मुरडली असली तरीही त्याची गुणवत्ता नेतृत्व सिद्ध करण्याची निश्चितच आहे. सोकॉल्ड समालोचक संजय मांजरेकर म्हणतात की, राहुलला आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान दिले गेले. तसा नवा पायंडा बीसीसीआयने पाडू नये. मात्र, त्याने एकदिवसीय, टी-20 तसेच कसोटी क्रिकेटमध्येही आपला दर्जा सिद्ध
केला आहे हे त्यांनी पाहिले नाही.
मागे एकदा रणजी करंडक स्पर्धेत मुंबई व हरयाणा यांच्यातील सामन्यात महान गोलंदाज कपिल देव यांच्या नेतृत्वात हरयाणाने बाजी मारली होती. त्यावेळी कपिल यांनी क्रिकेट सिर्फ मुंबई मे नही खेला जाता, असा खोचक टोला लगावला होता. तसाच टोला आता मांजरेकरांनाही लगावणे महत्त्वाचे असून मुंबईच्या बाहेरही क्रिकेटपटू घडतात हे सांगायला हवे.
माजी कसोटीपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनीही अशाच भाषेत मांजरेकरांवर टीका केली होती. रोहित शर्माला भारतीय संघातून वगळून राहुलकडे उपकर्णधारपद दिल्याची चीडचीड मांजरेकरांना झाली असावी व त्यातूनच त्यांनी राहुलच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले. कारणे काहीही असोत सध्याच्या घडीला महेंद्रसिंग धोनीचा पर्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत राहुलला पर्याय नाही. कदाचित हाच राहूल अनुभवसंपन्न होऊन धोनीचा वारसदारही ठरेल.
काही गोष्टींना पर्याय नसतात हे मान्य आहे. लतादीदी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांना जसे पर्याय नाहित तसाच धोनीलाही पर्याय नाही; पण एखादी साधना सरगम, एखादा रणबीरसिंग किंवा एखादा विराट कोहली हे जसे पुढे आले तसाच राहुलही पुढे येइल. ऑस्ट्रेलियाचा दौरा राहुलसाठी अत्यंत महत्वाचा आहे. यात त्याची कामगिरी, उपकर्णधारपदाची जबाबदारी सरस झाली तर त्याच्याकडे केवळ धोनीचा नव्हे तर, कोहलीचाही वारसदार म्हणून पाहिले जाईल यात शंका नाही.