आबूधाबी – किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने यंदाच्या स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याबद्दल पंचांच्या निर्णयाला जबाबदार धरले आहे. आम्ही सातत्यपूर्ण खेळ केला. मात्र, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पंचांनी एक धाव शॉर्टरन घोषित केली व तो सामना आम्ही गमावला, त्याचाच फटका आम्हाला या स्पर्धेत बसला व आमचे स्पर्धेतील आव्हानही संपले, अशा शब्दात राहुलने पंचांच्या सुमार कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रविवारी झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात पंजाबला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे स्पर्धेतून बाहेर जावे लागले. या संपूर्ण स्पर्धेत पंचांच्या कामगिरीवर सातत्याने टीका होत आहे. त्यात राहुलनेही आपला सुर मिसळला.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मैदानावरील पंच नितीन मेनन यांनी एक धाव शॉर्टरन घोषित केली होती व त्याच एका धावेमुळे पंजाबवर सामना सुपर ओव्हरमध्ये खेळण्याची वेळ आली. त्यात दिल्लीने बाजी मारली होती. त्यानंतर पंजाबने सलग पराभवही स्वीकारले. अर्थात त्यानंतर त्यांनी सलग पाच सामने जिंकत जोरदार पुनरागमनही केले. मात्र, शॉर्टरनमुळे जो सामना आम्हाला गमवावा लागला त्याचाच जास्त फटका बसला, असेही राहुलने सांगितले.
दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबला जिंकण्यासाठी 157 धावांची गरज होती. अखेरच्या षटकात पंजाबला 13 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी मयंक आग्रवालने पहिल्या तीन चेंडूंमध्ये 12 धावा केल्या. पंजाबचा संघ एका धावेने पिछाडीवर होता. हा सामना पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे सुपर ओव्हरमध्ये गेला.
सामना सुपर ओव्हरवरमध्ये जाण्यापूर्वी टीव्ही फुटेजमध्ये स्क्वेअर लेग पंच मेनन यांनी ख्रिस जॉर्डनला 19 व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर काढलेल्या दोन धावांपैकी एक धाव शॉर्टरन जाहीर केली. मात्र, रेकॉर्डिंगमध्ये ही धाव योग्य असल्याचे दिसले. तांत्रिक पुरावा असूनही पंचांनी हा निर्णय बदलला नाही. इतेच आमचे सर्वात मोठे नुकसान झाले, असेही राहुल म्हणाला.