– अमित डोंगरे
सौरव गांगुलीने बीसीसीआयची सूत्रे हाती घेतल्यावर आश्वासनांची खैरात केली होती. प्रत्यक्षात काहीही घडले नाही. आता त्याची जागतिक क्रिकेटमध्ये दादागिरी सुरू असताना केवळ महिलांच्या आयपीएलचा गाजावाजा केला जात आहे. ही स्पर्धा केवळ चार सामन्यांपूरती खेळवली जाणार का प्रत्यक्षात पुरुषांच्या आयपीएलप्रमाणे परिपूर्ण स्पर्धा खेळवण्यात येणार हे येत्या काळात कळेलच.
पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की महिलांच्या आयपीएलमध्ये केवळ राजाश्रयच राहणार की लोकाश्रय देखील दिसेल. लोकाश्रय नसेल तर प्रायोजक कसे पुढे येणार. बीसीसीआयकडे इतका अमाप पैसा आहे की खरेतर त्यांनीच ही स्पर्धा कोणाच्याही पाठिंब्याशिवाय खेळवली पाहिजे. गांगुलीला ही जगमोहन दालमियांचा वारसा पुढे घेऊन जायचे आहे. त्यामुळे तो देखील येत्या काळात काही स्पर्धांची निर्मिती करू शकतो. महिलांची चॅलेंजर स्पर्धा यंदा येत्या काळात पुण्यात खेळवली जाणार आहे. आता मुख्य आयपीएलप्रमाणे ही स्पर्धा जरी कक्षा रुंदावून खेळवली गेली तरीही वेगळ्या आयपीएलची गरज भासणार नाही.
जागतिक क्रिकेटमध्ये सध्या भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान व श्रीलंका यांच्या अनेक महिला क्रिकेटपटूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मग ती एलिसा हिली असो, हेदर नाईट असो किंवा श्रीलंकेची दीपीका रसंगिका असो सगळ्यांनीच पुरुषांनाही तोंडात बोटे घालायला भाग पाडले आहे.
भारतीय संघाबाबत स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, स्नेह राणा, रिचा घोष, शेफाली वर्मा या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
आता हीच वेळ आहे की त्यांच्या याच गुणवत्तेला महिलांच्या आयपीएलचेही व्यासपीठ मिळावे. गेली कित्येक वर्षे सुरु असलेली ही मागणी पुढील काही महिन्यांत प्रत्यक्षात उतरली तरच मुख्य आयपीएलच्या धर्तीवर भारताच्याच नव्हे तर जगभरातील सर्वच संघांना महिला खेळाडूंसाठी अफाट क्षमतेचा सेकंड बेंच मिळेल. याला गरज आहे ती गांगुलीसह संपूर्ण बीसीसीआयच्या पुढाकाराची.