मुंबई – कोकणात स्थानिकांच्या विरोधामुळे रखडलेला नाणार रिफायनरी प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या मार्गावर असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. नाणार प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन होत असल्याचे दिसत असल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे. तसेच नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचं आणि रोजगाराचं योगदान देण्याची क्षमता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. धर्मेंद्र प्रधान म्हणाले, संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या सहकार्याने कोकणच्या किनारपट्टीवर 60 लाख टन क्षमतेचा नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते. मात्र, दुर्दैवाने त्याला विरोध झाला. त्यात बहुमूल्य वेळ वाया गेला आहे. पण आता महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
प्रकल्पाचा आकार कमी करून तो कोकणातच उभारण्याचा विचार सुरू आहे. “देर आए, लेकिन दुरुस्त आए’ या न्यायाने सरकारच्या मतपरिवर्तनाचं स्वागतच केले पाहिजे.
तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे लाखो कोटी रुपये पुढील काही वर्षांत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत येतील. या प्रकल्पाशी निगडित पूरक उद्योग उभे राहतील आणि त्यातूनही मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल. देशालाही पेट्रोकेमिकल क्षेत्रातील या मोठ्या प्रकल्पामुळे ऊर्जा सुरक्षिततेचे ध्येय गाठण्यासाठी मदत होईल, असे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी स्पष्ट केले.