अमित डोंगरे
मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे याला चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी आपल्या संघात घेतले व कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्यावर विश्वास दाखवला. यातूनच रहाणेने गमावलेला आत्मविश्वास परत मिळवला व पुन्हा एकदा निवड समितीचे दार ठोठावले आहे.
माजी कसोटीपटू समालोचक संजय मांजरेकर म्हणतात तसे ज्या खेळाडूवर धोनी विश्वास ठेवतो ते कधीही चुकीचा ठरत नाही. धोनीने अमूक खेळाडूवर अनाकलनियपणे विश्वास ठेवला असे चाहते म्हणायचे परंतू जेव्हा हेच खेळाडू अफलातून कामगिरी करायचे तेव्हा मात्र, धोनीच्या निर्णयाचे कौतुकच व्हायचे. जे काही त्याने भारतीय संघाचा कर्णधार असताना केले तेच तो आता चेन्नई संघाचा कर्णधार असताना करत आहे.
कसोटी संघात रहाणे सातत्याने अपयशी ठरत होता. त्याचे आधी कर्णधारपद व नंतर उपकर्णधारपदही गेले तसेच त्यानंतर त्याचे कसोटी संघातील स्थानही गेले. त्यावेळी रहाणे एका कोशात गेला, त्याने आत्मविश्वासही गमावला होता. मात्र, त्याचवेळी देशांतर्गत रणजी तसेच अन्य स्पर्धांमध्ये त्याने सातत्याने धावा केल्या. मात्र, तरीही भारतीय संघाची निवड समिती त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. मात्र, यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या लिलावात धोनीने रहाणेवर विश्वास दाखवला व त्याला चेन्नई संघात घेतले.
इथून रहाणेच्या नव्या इनिंगची सुरुवात झाली. आपण केवळ कसोटी क्रिकेटपटू नसून टी-20 मध्येही आक्रमक फलंदाजी करु शकतो हे रहाणेने या स्पर्धेतील मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सर्वात कमी चेंडूत यंदाच्या स्पर्धेतील अर्धशतकी खेळी करताना एकूण 33 चेंडूत 61 धावा केल्या. तसेच त्यानंतरही त्याने सातत्य राखले व धोनीचा विश्वास सार्थ ठरवला. कोलकाताविरुद्धच्या लढतीतही त्याने 29 चेंडूत 71 धावांची वादळी खेळी केली.
रहाणेच्या या तंत्रशुद्ध आक्रमक फलंदाजीमुळे निवड समिती पुन्हा एकदा प्रभावीत झाली असून येत्या काळात त्याचे भारतीय संघात पुनरागमन घडेल असा विश्वास वाटतो. जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे व त्यात इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव असलेल्या रहाणेला संधी दिली जाइल याचेही संकेत मिळत आहेत. “धोनी है तो मुमकिन है ‘असे म्हणतात पाहू या काय होते ते.