नवी दिल्ली: नवोदित गोलंदाज दीपक चहरने बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात हॅट्ट्रिक साकार केली. त्यानंतर स्थानिक सामन्यातही त्याने हॅट्ट्रिक केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले मात्र याबाबत शहानिशा न करताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी चूक केली.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत राजस्थानकडून खेळताना चहरने लागोपाठ दुसरी हॅट्ट्रिक नोंदविली असल्याचे वृत्त प्रत्यक्षात चुकीचे असल्याचे स्पष्ट होत आहे.
विदर्भविरोधात झालेल्या सामन्यात चहरने चार गडी बाद करण्याची कामगिरी केली. मात्र, ही हॅट्ट्रिक नव्हती असे आता स्पष्ट झाले आहे. या सामन्यात चहरने 13 व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर विदर्भचा फलंदाज ऋषभ राठोडला बाद केले.
त्यानंतर चौथ्या चेंडूवर दर्शन नालकांडे आणि पाचव्या चेंडूवर श्रीकांत वाघ यांना बाद करत हॅट्ट्रिक केल्याचे वृत्त होते, मात्र, नालकांडे व वाघ यांना बाद करण्यापूर्वीचा चेंडू वाईड होता हे सामन्यानंतर पंचांनी निदर्शनास आणून दिले व ही हॅट्ट्रिक नव्हती हे स्पष्ट झाले.