मंचर – सहकार क्षेत्रात पतसंस्थांनी पारदर्शक कारभार करून विश्वासार्हता जपण्याचे काम करावे आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करावा, असे प्रतिपादन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. घोडेगाव येथे श्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले कन्या दत्तक पालक योजनेअंतर्गत 101 मुलींना शालेयपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले, यावेळी वळसे पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, नीलेश थोरात, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम भास्कर, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशराज काळे, सरपंच अश्विनी तिटकारे, उपसरपंच सोमनाथ काळे, पंचायत समितीचे माजी सभापती सखाराम घोडेकर, घोडेगाव पोलीस ठाण्याचे किरण भालेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका रत्ना गाडे, अनुसया पतसंस्थेच्या संचालिका ज्योती घोडेकर, संतोष सैद.
तानाजी जंबुकर, सोपान घोडेकर, विनोद काळे, वैभव मंडलिक, विठ्ठल करवंदे, किसन भास्कर, खंडू घोडेकर, तसेच संस्थेचे संचालक कैलास सोमवंशी, गोविंदराव घोडेकर, सुनील आकले, तहसीलदार संजय नागटिळक, सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी, गट विकास अधिकारी प्रमिला वाळूंज, घोडेगावच्या माजी सरपंच क्रांती गाढवे, संस्थेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, सहकारामध्ये विविध संस्था, बॅंका चुकीच्या कारभारामुळे अडचणीत आल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. संस्थांमधील असलेला पैसा हा जनतेचा असून आपण फक्त त्याचे विश्वस्त आहोत याचे भान ठेवून संस्थाचालकांनी विश्वस्तांच्या भूमिकेने काम करावे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भास्कर यांनी प्रास्ताविक केले.