नगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शिर्डी दौरा येत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाला असून त्यांनी मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात मराठा आरक्षणाबाबत मोदींना जाब विचारणार आहे. नरेंद्र मोदी मराठा आरक्षणाबाबत काहीच बोलले नाही तर कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने विचार करून घोषणाबाजी देणार असल्याचे आज संभाजी ब्रिग्रेडच्या पदाधिकारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, जल्हाध्यक्ष राजेश परकाळे, शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाध्यक्ष गिरीश जाधव उपस्थित होते. सावंत म्हणाले, मराठा आरक्षणासाठी निराशेच्या भावनेमधून मराठा तरूण आत्महत्या करत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचे ठाम मत तयार झाले आहे.
राज्यकर्ते म्हणून मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणे, ही राज्य व केंद्र सरकारची जबाबदारी आहे. सरकार गोडगोड बोलून वेळ मारून नेत आहेत. आता जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे होणाऱ्या सभेत मराठा आरक्षण विषयावर जाहीर भूमिका मांडून मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे. अन्यथा सभेत शिरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
खा. डॉ. विखे यांची भेट घेऊन आम्ही आमची भूमिका सांगितली आहे. त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधानांच्या कानावर घातला जाईल, असे आश्वासन दिल्याचे सावंत यांनी सांगितले.जाधव म्हणाले, शिवसेनेचा ठाकरे गट व संभाजी ब्रिगेड यांचे सुमारे पाच हजार कार्यकर्ते सभेला उपस्थित राहतील. मोदींनी आरक्षणावर भूमिका जाहीर केली नाही तर कार्यकर्ते एकाचवेळी उभे राहतील व जाब विचारतील.