पिंपरी – भाजपच्या सत्ता काळात आंद्रा योजनेचे शंभर एमएलडी पाणी मंजूर केले. या योजनेमुळे पिंपरी चिंचवड शहराला अतिरिक्त पाणी मिळाल्याने समाविष्ट गावातील नागरिकांची तहान भागणार आहे. त्यामुळे पाण्याचे श्रेय प्रशासनाने न घेता ते भाजपला द्यावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी केले आहे. येत्या पंधरा दिवसांत समाविष्ट गावांना पाणी पुरवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर श्रेय नेमके कोणाचे ? यावरून वाद उफाळून आला आहे.
पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहराला दररोज पाणी पुरवठा केला जातो. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे शहराला पाणी पुरवठा कमी पडू लागला. त्यामुळे बंदिस्त जलवाहिनी योजना करण्यात आली. परंतु स्थानिक शेतक-यानी विरोध केला. त्यांच्या आंदोलनावर तत्कालीन आघाडी सरकाराने गोळीबार केला. त्यामुळे बंदिस्त जलवाहिनी योजना बासनात गुंडाळून ठेवावी लागली. सद्यस्थितीला दररोज 500 एमएलडी पाणी पवना धरणातून घेवूनही शहराला पाणी पुरवठा कमी पडत होता.
याबाबत माजी सत्तारुढ पक्षनेते आणि भाजपचे विद्यमान प्रदेश प्रवक्ता एकनाथ पवार यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी 100 एमएलडी आंद्रा योजनेचे आणि भामा-आसखेड योजनेचे 167 एमएलडी असे एकूण 267 एमएलडी पाणी भाजपच्या सत्ता काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंजूर केले. याकरिता आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनीही योजना मंजूर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला.
त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला आंद्रा योजनेचे शंभर एमएलडी पाणी मिळाल्याने समाविष्ट गावांची तहान भागणार आहे. यामध्ये मोशी, चऱ्होली, डुडूळगांव, वडमुखवाडी आणि भोसरीचा काही भागास पिण्याचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाने आंद्रा योजनेचे काम पूर्ण केले आहे. त्या योजनेचे पाणी येत्या पंधरा दिवसांत समाविष्ट गावातील नागरिकांना देण्यात येणार आहे. माञ. पाणी पुरवठा योजनेचे श्रेय पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचे आहे. त्या योजनेचे श्रेय प्रशासनाने घेवू नये, असे आवाहन प्रदेश प्रवक्ते पवार यांनी केले आहे.