पुणे : युवकांनी आधुनिक विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवावे. छात्र संसदेतील विचारमंथनाच्या माध्यमातून विश्वबंधुत्वाच्या भारतीय विचाराचा प्रसार आणि विकास करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप सत्राला दूरदृष्य प्रणालीद्वारे त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार, पद्मभूषण सुमित्रा महाजन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, एमआयटी विद्यापीठाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड, राहुल कराड आदी उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, समाजाला सकारात्मक दृष्टीकोनाची गरज आहे. भारत हे लोकशाही राष्ट्र असल्याने आपल्याला स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी जीवनापासूनच चांगले लोकशाही राष्ट्र घडविण्याचा विचार करावा. जीवनात कोणत्याही परिस्थितीत निराश न होता उच्च ध्येय ठेवून वाटचाल सुरू ठेवावी.
छात्र संसदेच्या माध्यमातून युवकांना संसदीय लोकशाहीसाठी आवश्यक नव्या गोष्टी कळतील. सहभागी युवकांनी विविध विषयावर विचार करावा आणि राष्ट्र उभारणीत आपले योगदान कसे देता येईल याचा ध्यास धरावा. छात्र संसदेच्या माध्यमातून युवकांना चांगले मार्गदर्शन मिळेल आणि हा उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.