मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारचा अद्याप दूसरा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. या मंत्रीमंडळ विस्तारासाठी अनेक नेते मंडळी उत्सुक आहेत. मात्र आता मंत्रीमंडळ लवकरच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी पक्षाने यावरून शिंदे -फडणवीस सरकारवर टीका देखील केली. आता ठाकरे गटाच्या सामना अग्रलेखातून देखील मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
‘महाराष्ट्रात गतिमान सरकार आल्याची पुंगी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस वाजवत असतात. आपले सरकार ‘डबल इंजिन’वाले आहे असे ते म्हणतात. पण इंजिनास ‘तेलपाणी’ करण्यासाठी त्यांना वारंवार दिल्लीच्या सर्व्हिसिंग स्टेशनला जावे लागते. यालाच जर हे लोक गतिमान सरकार म्हणत असतील तर काय बोलायचे? सत्य असे आहे की, तथाकथित गतिमान सरकारचा वेग बैलगाडीपेक्षा कमी आहे,’ असे म्हणत ठाकरे गटानं सरकावर टीका केली आहे.
पाळणा इकडे व दोरी हलवणारे दिल्लीत
‘मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर पहिला विस्तार करायला ४१ दिवस लागले व त्या विस्तारास नऊ महिने होऊन गेले तरी दुसऱ्या विस्ताराचा पाळणा हलायला तयार नाही. कारण सगळाच ‘वांझ’ कारभार सुरू आहे. पाळणा इकडे व दोरी हलवणारे दिल्लीत असे चित्र आहे.
दिल्लीला हेलपाटे मारून थकले
वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही आणि विस्तार व्हावा यासाठी मिंधे-फडणवीस दिल्लीस हेलपाटे मारून थकले आहेत. जे सरकार वर्षभर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची हिंमत दाखवू शकले नाही त्यांनी गतिमानतेच्या गोष्टी कराव्यात याचे आश्चर्य वाटत आहे.
निवडणुका घेतल्या तर शिवसेनेचाच महापौर होईल
महाराष्ट्राची राजधानी मुंबई नगरीस महापौर नाही. मुंबई नगरी महापौरविना उघडीबोडकी आहे. महापौर नाही, महापालिकेत लोकनियुक्त सरकार नाही. मंत्रालयातून त्यांना हवा तसा कारभार हाकला जात आहे. बरे, महापौर व निवडणुका का नाहीत? तर निवडणुका घेतल्या तर शिवसेनेचाच महापौर होईल या भयाने गतिमान सरकारने मुंबईच्या महापौरपदाचा कोंबडा झाकला आहे. भारतीय जनता पक्षाची बदके अधूनमधून आमचाच महापौर असे सांगत आहेत. त्यावर गतिमान मिंधे गट बोलायला तयार नसल्याचे सामना अग्रलेखात म्हंटले आहे.