भोपाळ – निवडणूक लढवण्यासाठी गोपालन अनिवार्य करावे, अशी मागणी मध्यप्रदेशचे मंत्री आणि भाजप नेते हरदीपसिंग डांग यांनी सोमवारी केली. संबंधित मागणीचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.
एका कार्यक्रमात बोलताना डांग यांनी गोमातेच्या रक्षणाची आग्रही भूमिका मांडली. गोरक्षणासाठी समाजाच्या सर्व घटकांचे योगदान निश्चित करण्याच्या उद्देशातून कायदा बनवला जावा. लोकप्रतिनिधी समाजाचाच भाग असल्याने त्यांचेही योगदान असायला हवे. त्यामुळे गोपालन न करणाऱ्या उमेदवारांचे निवडणूक अर्ज रद्द ठरवले जावे.
सरकारी कर्मचाऱ्यांना गोपालन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे दरमहा 25 हजार रूपयांपेक्षा अधिक वेतन असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक महिन्याला 500 रूपयांची देणगी घेतली जावी.
शेती करणाऱ्यांसाठी आणि कृषी उत्पादनांची खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठीही गोपालन अनिवार्य केले जावे. गोरक्षणाविषयी केवळ बोलण्याऐवजी ठोस प्रयत्न होण्याची गरज आहे, असे मंत्री महोदय म्हणाले. संबंधित भूमिका माझे वैयक्तिक मत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.