इनसाईड काबूल
काबूल – अफगाणीस्तानातील युध्द संपले असून राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी हे देश सोडून परागंदा झाल्याचे तालिबानने सोमवारी जाहीर केले. काबूलच्या रस्त्यावर सोनवारी भयाण शांतता होती. मात्र विमान तळावर गोंधळ आणि भीतीची दाट छाया पसरली होती.
दोहा मधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख महंमद नईम म्हणाले, आमच्या गटाला फार काळ अज्ञातवासात रहावे लागणार नाही. अफगाणीस्तानमधील नव्या सरकारचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. आम्हाला आंतरराष्ट्रीय संबंध हे शांतततेचे हवे आहेत.
आमच्या देशातील युद्ध संपल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आम्हाला जे हवे होते ते म्हणजे आमचा देश आणि आमचे नागरिक यांचे स्वातंत्र्य, तेथपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
आम्ही कोणालाही लक्ष्य बनवण्यासाठी आमच्या भूमीचा वापर कोणालाही करू देणार नाही आणि आम्ही कोणालाही इजा पोहोचावयाची नाही, असे ते म्हणाले.
काबूलच्या रस्त्यावर तालिबानचे नियंत्रण असल्याचे वृत्त अल जझीरा वृत्तसंस्थेने दिले आहे. तालिबानने सांगितले की, विशेष दलाचे एक हजार युनिट आम्ही रात्रीत तैनात केले आहेत. ते सर्व गस्ती नाक्यांवर पहारा देत आहेत. अन्य काही गस्ती नाके आम्ही उभअरले आहेत, असे तालिबानने स्पष्ट केले आहे.
शेकडो तालिबानी योध्दे अफगाण सरकारच्या वाहनांतून रस्त्यावरून गस्त घालताना आम्ही पाहिले आहे, असे अल जझीराच्या पत्रकाराने सांगितले. ते म्हणाले, रस्तावर फारसे नागरिक दिसत नाहीत. त्यामुळे जनजीवन अद्याप सुरळीत झालेले नाही.
तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्लाह मुजाहीद म्हणाला, काबूलमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. आमचे योध्दे सुरक्षा पुरवण्यात व्यस्त आहेत.
तालिबानने काबूल शहराच्या विविध भागात विशेष पथके तैनात केली आहेत. मुजाहिद्दीन आल्यामुळे सामन्य जनता आनंदी आहे. ते आपल्या सुरक्षेविषयी समाधानी आहेत.