पुणे – राज्यातील विद्यापीठांमधील अभ्यासक्रम व श्रेयांक आराखडा एकसमान राहण्याच्या दृष्टीने विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्यासाठी कुलगुरु, प्र-कुलगुरुंचा समावेश असलेल्या 7 जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला शिफारशींचा अहवाल शासनाकडे एक महिन्यात सादर करावा लागणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 ची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या धोरणाचा अभ्यास करून राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2020 च्या शासन निर्णयानुसार नवी दिल्लीतील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट स्थापन करण्यात आला होता. या कार्यबल गटाने आपला अहवाल शासनाला 30 जून 2021 रोजी सादर केला होता.
तीन किंवा चार वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी अभ्यासक्रमांच्या रचनेसंदर्भात सर्व विद्यापीठांच्या संबंधित विषयाच्या अभ्यासमंडळाच्या अध्यक्षांचे प्रतिनिधीत्व असलेला ई-अभ्यासमंडळ मंच स्थापन केला जाईल, अशी शिफारस या अहवालात केलेली आहे. त्यानुसार राज्यातील विद्यापीठांमधील अभ्यासक्रम व श्रेयांक आराखडा एकसमान राहण्याच्या दृष्टीने विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्यासाठी व प्रस्तावित ई-अभ्यासमंडळ मंचांना मार्गदर्शन करण्यासाठी कुलगुरुंची समन्वय समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मान्यता दिलेली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे कुलगुरु आदींचा समिती सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठांच्या प्र-कुलगुरुंचा सदस्य सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे.समन्वय समितीचा कालावधी हा प्रथम टप्प्यात दोन वर्षांचा राहणार आहे.
असे राहील समितीचे कार्य…
समन्वय समिती विद्यापीठांच्या अभ्यासमंडळाप्रमाणे विषय, गटनिहाय, विद्याशाखानिहाय ई-अभ्यासमंडळ मंच स्थापन करण्याबाबत विचारविनिमय करून त्याप्रमाणे मंचांची स्थापना करण्याबाबत शासनास शिफारस केली जाणार आहे. या मंचाच्या प्रभावी कामकाजासाठी आराखडा तयार करून व त्याच्या अंमलबजावणीसाठी समिती मार्गदर्शन करेल तसेच ई-अभ्यासमंडळ मंचाचे सनियंत्रण करेल. सर्व ई-अभ्यासमंडळ मंचांच्या वार्षिक अहवालांचा कार्यकारी सारांश समितीद्वारे संकलित करून तो कुलगुरुंच्या संयुक्त बैठकीत सादर केला जाईल.