मंचर, (प्रतिनिधी) – बदललेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यामध्ये शिक्षकांना वर्षभरामध्ये ५० तासाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. शिक्षकांमध्ये सुद्धा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास घडून आला पाहिजे. ज्ञानरचनावाद यामध्ये विद्यार्थी कृती केंद्रित अभ्यासक्रमावर विशेष भर दिला पाहिजे, असे आवाहन इंग्रजी विषयाचे राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक बालाजी नगरगोजे यांनी केले .
मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता नववी ते बारावीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे व पंचायत समिती आंबेगाव शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण तिन्ही टप्पे पूर्ण झाले.
प्रशिक्षण डायटच्या प्राचार्य डॉ. स्नेहा बेलसरे ,वरिष्ठ अधिव्याख्याता राजश्री तिटकारे, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सविता माळी, विस्तार अधिकारी गजानन पुरी, शिक्षण विभागाचे समन्वयक योगेश देशमुख तसेच नारायण चित्ते व तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण संपन्न झाले. निरोप समारंभप्रसंगी महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम आवारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे शिक्षण विभागाने १२ तज्ज्ञ मार्गदर्शकाची नियुक्ती केली होती. यात इंग्रजी विषयाचे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक बालाजी नगरगोजे यांनी खास आपल्या शैलीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
दीपक कर्डिले, प्रकाश कदम इतर मार्गदर्शकांनी या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन केले. प्राथमिकचे मुख्याध्यापक संजय दवंडे, लिपिक सागर खेडकर यांनी चांगल्या प्रकारची बैठक व्यवस्था उपलब्ध करून दिली. तसेच तनवीर शेख यांनी प्रशिक्षणार्थी यांना भोजन दिले. पंचायत समिती शिक्षण विभागाचे समन्वयक योगेश देशमुख यांनी आभार मानले.