नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. बसपा सुप्रीमो मायावती यांनी आज विरोधी पक्षांच्या आघाडीच्या ‘इंडिया’ या युतीचा यापुढे आपण भाग नसल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यासोबतच लोकसभा निवडणूक आपण स्वबळावर लढवणार असल्याचे म्हटले आहे.
बसपा नेत्या मायावती यांनी इंडिया आघाडीत जाण्याची जास्त होती. मात्र मायावतींनी आज सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करत आपण कोणत्याही आघाडीचा भाग बनणार नसल्याचे सांगितले. त्यासोबतच एनडीए आणि इंडिया युती हे बहुतांशी गरीब विरोधी, जातीयवादी, सांप्रदायिक भांडवलशाही धोरणे असलेले पक्ष आहेत, ज्यांच्या धोरणांविरुद्ध बसपा सतत लढत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत युती करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.
मायावतींनी घेतलेल्या या भूमिकेनंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. सपा नेत्या आणि प्रवक्त्या जुही सिंह यांनी सांगितले की, मायावती भाजपसोबत आहेत आणि त्यामुळे त्या’ इंडिया’चा सहभागी होऊ इच्छित नाहीत. त्या बाहेर राहून ती एनडीएला मदतच करणार असल्याचा आरोप देखील त्यांनी वेळी केला. तसेच त्या नेहमीच फक्त स्वतःच्या फायद्यासाठी निवडणूक लढवतात. त्यांनी कधीही दलित जनतेचा विचार केला नाही त्यामुळे त्या दलितांच्या नेत्या नाहीत हे आता जनतेला समजले आहे.असेही जुही सिंह म्हणाल्या.
तर दुसरीकडे भाजप नेते आणि यूपी सरकारमधील मंत्री मोहसिन रझा यांनी मायावतींच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत,” मायावतींनी मोठ्या मनाने यावे आणि एनडीएमध्ये सामील व्हावे. भाजपने यापूर्वी मायावतींचा सन्मान करून त्यांना राज्याचे प्रमुख (मुख्यमंत्री) बनवण्याचे काम केले होते.तसेच समाजवादी पक्षाचे नेते त्यांचा अपमान करत असताना भाजपने त्यांना (मायावती) पाठिंबा दिला होता. सपाने नेहमीच त्यांचा तिरस्कार केला आणि राजकीयदृष्ट्या त्यांचे नुकसान केले. मोदी सरकार सर्वांना सोबत घेऊन काम करते. दलित आणि मागासवर्गीयांचे उत्थान झाले आहे. मायावतींना एनडीएमध्ये मान मिळेल आणि त्यांच्या येण्याने दलित उन्नतीचा लढा अधिक बळकट होईल,असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.