सातारा – लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंराजे भोसले यांच्यामुळे सातारा शहरात भाजप- शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचा जोर दिसत असला तरी प्रचारातून अनेक नगरसेवक गायब असल्याची चर्चेनेही जोर धरला आहे.
सातारा विकास आघाडीचे 22 नगरसेवक आहेत. त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील इतके नगरसेवक वगळता इतर नगरसेवकांनी प्रचाराला दांडी मारल्याची चर्चा आहे.
त्या तुलनेत आमदार गटाच्या प्रचारात नगरसेवक प्रचारात सहभागी असल्याने नागरिकांशी थेट संवाद होत आहे. आपापल्या भागातील पदयात्रा व कोपरा सभा वगळता नगरसेवकांनी ऐन निवडणुकीच्या गडबडीत सुट्टी काढल्याची शंका घेण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांत सातारा शहरात झालेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यात नगरसेवक टाळाटाळ करत असल्याने नेत्यांच्या प्रचारात मरगळ येत आहे.
एरवी जलमंदिरात जाऊन लुडबुड करणारे नगरसेवक गायब झाल्याने साताऱ्यात महायुतीच्या प्रचारात मनोमीलन आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. भाजपच्या निष्ठावंतांना सूचना आल्यानंतर त्यांनी उदयनराजेंचाही प्रचार व्यवस्थित सुरू केला आहे; पण पालिकेत मिरवणारे काही पदाधिकारी प्रचारातून गायब असल्याचे उदयनराजेंच्या कोअर कमिटीच्या लक्षात आले आहे. त्यावर रजताद्रीच्या “वॉररूम’मधून उपाय योजले जात आहेत.
उदयनराजे यांच्याकडे तब्बल बावीस नगरसेवक आहेत. अगदी पाच सहाजण वगळता इतर दोन डझन नगरसेवक मात्र आदेश आल्याशिवाय नाही, या पध्दतीने वागत आह . सातारा शहराची लोकसंख्या तब्बल एक लाख 27 हजार 53 इतकी आहे. त्या मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहचणे आवश्यक असताना नगरसेवकांची राजकीय मरगळ संपली नसल्याची तक्रार आहे.
शहरातील आघाडी वाढविण्याची संधी
2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उपनगरांच्या तुलनेत सातारा शहरातूनच कमी मतदान झाले होते. मताधिक्क्य घटल्याने शिवेंद्रराजेंच्या अडचणी वाढल्या होत्या. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना सातारा शहरातील आमदारबहुल वॉर्डातून मताधिक्क्य मिळाले होते. मात्र, सातारकरांची ही आघाडी एकत्रितपणे वाढविण्याची संधी असताना प्रत्यक्ष रणांगणावरची नगरसेवकांची प्रचार यंत्रणा साताऱ्यात दिसेनाशी झाली आहे.