पाईट येथील सभेत अतुल देशमुख यांचे प्रतिपादन
पाईट – खेड तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या हक्कासाठी लढाई करावी लागत आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी आजी-माजी आमदार अपयशी ठरले असून हे प्रश्न आगामी काळात आम्ही मार्गी लावू, असे प्रतिपादन अतुल देशमुख यांनी केले.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांची जाहीर सभा गुरुवारी (दि.10) पाईट येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टेपाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, कैलास गाळव, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, भामा आसखेड प्रकल्प बाधित शेतकरी संघटनेचे देविदास बांदल, पंचायत समितीचे सदस्य चांगदेव शिवेकर, नगर सेविका रेखा क्षोत्रीय,काळुराम पिंजण, पाईटच्या सरपंच मंगल भांगे, महादू डांगले, कैलास सोनवणे, गुलाब खेंगले, रामदास सावंत, गौतम सोनवणे, किसान शिंदे, सुरेश घुले यांच्यासह पाईट आंबोली परिसरातील मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
अतुल देशमुख म्हणाले की, भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत ते सोडविण्यात आजी-माजी आमदार अपयशी ठरले आहेत. पुण्याला पाणी जाऊ देणार नाही. वेळप्रसंगी रक्त सांडण्याची भाषा करणारे आज गप्प का आहेत? चिरीमिरी मिळण्याच्या पाठीमागे असलेले आमदार प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न सोडवू शकत नाही. त्यासाठी प्रकल्पग्रस्त माणसालाच संधी द्या, तुम्ही दिलेल्या संधीचे सोने करून दाखवेल. आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपल्यातील माणूस निवडून द्या. माझा जन्म लाल माती मधील आहे. कुणाला भीत नाही माझ्याबरोबर मावळा आहे. मुळमुळू आमदाराने आमच्या व आमच्या कार्यकर्त्यांच्या नादी लागू नये. आम्ही बंडकऱ्यांची माणसे आहोत. सोडणार नाही असा घणाघाती हल्ला आमदार गोरे यांचे नाव न घेता केला. विकास तर काहीच नाही;मात्र जिल्हा परिषदेच्या फंडातून मंजूर झालेल्या कामाचा नारळ फोडणाऱ्या आमदारांना घरी बसावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी अमोल पवार,दिलीप मेदगे कैलास गाळव यांच्यसह पाईट भागातील कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली.
आमची बडांशी युती नाही आमची युती मातीशी आहे. आमचे राजकीय नुकसान होईल, याचा विचार आम्ही केला नाही. मात्र, आपल्या मातीमधील अतुल देशमुख हे नेतृत्व असल्याने त्याच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहोत तुम्ही पण त्यांना साथ द्या. त्याचे निवडणुकीतील कपबशी हे चिन्ह माणुसकीचे, आपुलकीचे प्रतीक आहे. माणुसकीला साथ द्या विकास साधा. सगळ्या पक्षाची मंडळी आमच्या बरोबर आहेत. या निवडणुकीत जनतेतील अपक्ष उमेदवार निवडून येणारच आणि आजी-माजीला दणका देणारच असा विश्वास आहे.
– शरद बुट्टे पाटील, गटनेते, जिल्हा परिषद