नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातला आहे. कुठे ऑक्सिजन तर कुठे बेड मिळण्यासाठी नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. या सर्व परिस्थितीचा सर्वात जास्त फटका या दिल्लीला बसला आहे. दिल्लीत सध्या कोरोनाची चौथी लाट आली आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पाहायला मिळतोय. अशावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने कोरोना विषाणू विरोधातील लढाई लढण्यासाठी आता केंद्र सरकारकडे लष्कराच्या मदतीची मागणी केली आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना त्याबाबत एक पत्र लिहिलं आहे. मनीष सिसोदिया यांनी राजनाथ सिंह यांना लिहिलेल्या पत्रात ऑक्सिजन आणि रुग्णालय उभारण्याची मागणी केली. ‘राजधानी दिल्लीसाठी शक्य होईल तेवढे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले जावेत. त्याचबरोबर DRDO मध्ये ज्या प्रमाणे एका रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार अजून काही रुग्णालयांची उभारणी करण्यात यावी’, अशी मागणी सिसोदिया यांनी पत्राद्वारे राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.
ऑक्सिजनच्या मुद्द्यावर सिसोदिया यांनी म्हटले आहे की, दिल्लीचा अद्याप गरजेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. रविवारी दिल्लीला 440 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मात्र, दिल्लीचा कोटा हा 590 टन इतका आहे. इतकच नाही तर सध्या दिल्लीतील ऑक्सिजनची मागणी आता 976 मेट्रिक टन इतकी बनली असल्याचंही सिसोदिया म्हणाले.
दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आणि संबंधित मुद्द्यांवर सोमवारी उच्च न्यायलयात सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लष्कराची मदत मिळावी यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलं आहे.