ठोसेघर – सातारा तालुक्याच्या शहरी भागात गेल्या काही काळापासून करोनाबाधित रुग्ण आढळले होते. परंतु, शहराच्या तुलनेत सर्वाधिक मुंबईकर चाकरमान्यांची संख्या असलेल्या परळी खोरे, ठोसेघर, कास या ग्रामीण भागांमध्ये एकही करोनाबाधित नव्हता. टाळेबंदीच्या शिथिलतेनंतर मुंबई, पुणे या ठिकाणी अडकून पडलेले चाकरमानी मोठ्या संख्येने मिळेल त्या वाहनाने गावाकडे दाखल होत आहेत. काही दिवसांपूर्वी परळी खोऱ्यातील रायघरपाठोपाठ कुस खुर्द, खडगाव त्यानंतर दुर्गम भागातील चाळकेवाडी येथेही करोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनासोबत गावकऱ्यांची चिंता वाढली आहे.
परळी खोऱ्यात स्थानिक भूमिपूत्र मोठ्या प्रमाणावर पुरेशा रोजगार संधीअभावी मुंबई, पुणे या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झाले आहेत. करोनाच्या संसर्गाने हाहाकार माजला असून मुंबई, पुणे या शहरांमध्ये सर्वाधिक याचा प्रादुर्भाव झाला आहे. मुंबई, पुण्यात अडकून पडलेले चाकरमानी टाळेबंदीच्या शिथिलतेमध्ये राज्य सरकारने दिलेल्या मुभेनंतर उपलब्ध होईल त्या वाहनाने गावाकडे धाव घेत आहेत. करोना विषाणूंचा संसर्ग सुरुवातीच्या काळामध्ये परळी खोरे, ठोसेघर हा ग्रामीण भाग करोनाच्या संकटापासून अलिप्त होता. परंतु, रायघर, कुस खुर्द, खडगाव व त्यापाठोपाठ दुर्गम असलेल्या चाळकेवाडीमध्येही करोना पॉझिटिव्ह आढळल्याने या पट्ट्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागात शुकशुकाट
टाळेबंदीच्या सुरुवातीच्या तीन टप्प्यांमध्ये सातारा शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला होता. मात्र, याचदरम्यान, तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये अनेकजण टाळेबंदीची पायमल्ली करत फिरत होते. टाळेबंदीच्या शिथिलतेच्या दरम्यान शहरी भागात नागरिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना पाहायला मिळत आहे. याच वेळी ग्रामीण भागामध्ये करोना बाधितरुग्ण सापडल्यामुळे शुकशुकाट पसरला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.