नवी दिल्ली – संपूर्ण देश करोना विषाणूच्या सावटाशी लढत असताना, संसदेच पावसाळी अधिवेश 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत घेण्याचा प्रस्ताव कॅबिनेट कमिटीने मांडला आहे. राज्यसभेचे अध्यक्ष आणि उप-राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज करोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थेचा आढावा घेतला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना बसण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जावा यासाठी अध्यक्षांच्या खुर्चीसमोर खास व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
तसेच संसदेतही सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे पालन व्हावे यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. राज्यसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, सभासद गॅलरी आणि चेंबर अशा दोन्ही ठिकाणी बसतील. 1952 नंतर प्रथमच संसदेमध्ये अशाप्रकारची आसनव्यवस्था केली जाणार आहे. यावेळी मान्सून अधिवेशनात 18 बैठका होणार असून दोन्ही सभागृहांत तयारीला आता वेग आला आहे.