नवी दिल्ली- सीमेवरून सैन्य माघारी घेण्याचे संकेत चीनकडून मिळत नसतानाच प्रत्यक्ष ताबा रेषेवर उभारत आहेत हे बांधकाम पॅनगोंग टिसो भागात असल्याचे आढळत आहे.
भारताबरोबर सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी पातळीवरच्या चर्चा सुरू असताना चीनने वायरलेस तंत्रज्ञानाचा पाचव्या टप्प्यातील ऑप्टिक केबल जाळे टाकण्यास सुरवात केली आहे. त्याचबरोबर अन्य यंत्रणा उभारण्यात येत आहे. पॅनगोंग तलावाच्या परिसरात चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने बराकी आणि अन्य इमारती उभारत आहे.
याबाबतचा इशारा भारतीय गुप्तचर खात्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिला होता.
आपले सैन्य माघारी घेण्याची भाषा चीन बोलत असताना गुप्तचरांनी त्यांच्या या नव्या बांधकामाकडे लक्ष वेधले आहे. सीमेवरून सैन्य मागे घेण्यासाठी दोन्ही देशांत चर्चा सुरू असतानाच नवे तंबू आणि निवारे उभारले जात असल्याचा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
गलवान खोरे आणि गस्तीनाका 15 येथूनच सैन्य काहीसे मागे घेतले आहे. मात्र पॅनगोंग तलाव आणि गोग्रा -हॉट स्प्रिंग भागातील गस्तीनाका क्र. 17 येथील परिस्थितीत तणाव कायम आहे.
पॅनगोंग लेक परिसरात फिंगर 5 ते फिंगर 8 या भागात चीनने आपली बाजू भक्कम करून ठेवली आहे. या भागात त्यांनी मे महिन्यांपासून अनेक बांधकामे केली आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी चर्चेचे मार्ग अयशस्वी ठरले तर लष्करी पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो, असे विधान केले होते.
सीमेत एकतर्फी बदल करण्याचा हा चीनचा काही पहिलाच प्रयत्न नाही. लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेशला लागून असणाऱ्या सीमेवरही चीनने मोठ्यासंख्येने बांधकामे केली आहेत. तेथेही लष्कर मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहे. तेथे तोफदळही मोठ्या संख्येने तैनात केले आहे.