मुंबई – करोनाच्या वाढत्या समस्येवर प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर मुंबई मॉडेल इतर शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये राबवता येऊ शकते, असे मत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मांडले आहे. केंद्राने मुंबई मॉडेलचे अनुकरण करावे, अशी सूचना दोनच दिवसांपूर्वी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबई मॉडेलचा गाजावाजा होत असताना चहल यांनी आपली प्रतिक्रिया एका माध्यमाशी बोलताना दिली आहे.
भारतीय प्रशासनात काम करणारे मित्र दोन महिन्यांपूर्वी मला फोन करून फक्त महाराष्ट्रातच करोना आहे का, असे प्रश्न विचारत हसत होते. जर एखादी व्यक्ती आपल्यावर हसत असेल तर माझी काम करण्याच्या मॉडेलबाबत मी त्यांना कसे सांगेन? जेव्हा आपत्ती येते तेव्हा शिकण्याची वेळ नसते, तेव्हा त्या मॉडेल्सप्रमाणे काम करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नसल्याचेही आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी म्हटले आहे.
बेड्स वाढवण्याची सक्ती कोणत्याही रुग्णालयामध्ये करू नये, असे मी दिल्ली सरकारला सांगितले आहे. ऑक्सिजनयुक्त बेड वाढवल्यामुळे रुग्णालयांकडून एसओएस कॉल वाढत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन मिळत नसल्याचे चहल यांनी सांगितले. उपलब्ध ऑक्सिजनचा योग्य उपयोग, योग्य वितरण आणि बफर स्टॉक तयार ठेवणे, यामुळे मुंबईची ऑक्सिजन समस्या आता इतिहासजमा झाल्याचे चहल म्हणाले.
मुंबईत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणताही मृत्यू झाला नसल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले. पण एका मध्यरात्री आलेल्या संकटाबद्दल त्यांनी सांगितले. ऑक्सिजनच्या कमी पुरवठ्यामुळे 16 आणि 17 एप्रिलच्या मध्यरात्री सहा रुग्णालयातील 168 रुग्णांना मुंबईच्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. त्यातील 40 रुग्णांची परिस्थिती गंभीर होती. अखेर सकाळी 1 ते 5 च्या दरम्यान सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर मला शंभर टक्के रुग्णांचा जीव वाचवता आला याचा आनंद असल्याचे चहल म्हणाले.
राज्याच्या टास्क फोर्ससोबत या घटनेनंतर संपर्क साधत आम्ही ऑक्सिजनच्या वापरासाठी प्रोटोकॉल ठरवण्याची विनंती केली. ऑक्सिजनचे कोणतेही प्रश्न उद्भवू नयेत यासाठी केंद्रात पोस्टिंगदरम्यान सोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत आपण दिल्लीतही याबाबत बोललो असल्याचे चहल म्हणाले. कॅबिनेट सचिव राजीव गौबा, गृहसचिव आणि आरोग्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील आठ मुख्य राजकारण्यांनाही मी याबाबत सांगितल्याचे चहल म्हणाले.