मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत ११७ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
162 new COVID19 positive cases reported in Maharashtra today, taking the total number of positive cases in the state to 1297: Maharashtra Health Department pic.twitter.com/YWDIgwVn99
— ANI (@ANI) April 9, 2020
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७ हजार ९० नमुन्यांपैकी २५ हजार ७५३ जणांचा कोरोना तपासणी अहाल निगेटिव्ह आला आहे. तर ११३५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आतापर्यंत ११७ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३४ हजार ९०४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४४४४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
दरम्यान, बुधवारी राज्यात ८ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या मृतांपैकी ५ जण मुंबईचे तर २ पुण्याचे आणि एक जण कल्याण डोंबीवलीमधील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ७२ झाली आहे. निजामुद्दीन येथील झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी २५ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.