महाबळेश्वर -महाबळेश्वरमधील नव्वद टक्के लोकांचा चरितार्थ पर्यटन व्यवसायावर चालतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेल्या महाबळेश्वरात एकही औद्योगिक कारखाना नसून येथे आलेल्या पर्यटकांना सोयीसुविधा देण्यावरच येथील हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग, आईस्क्रीम पार्लर, दुकानदार, टॅक्सीचालक, घोडेचालक, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी या सर्वांचा व्यवसाय पर्यटकांवर अवलंबून असतो; परंतु यंदा करोनामुळे उन्हाळ्याचा ऐन पर्यटन हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्याचबरोबर येथील पर्यटनावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
एप्रिलमध्ये शैक्षणिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी हा पर्यटनाचा मुख्य हंगाम असून पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वरमध्ये येतात. हा हंगामात येथील व्यावसायिकांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. पावसाळ्यात पर्यटन हंगाम ओसरते. काही हौशी पर्यटक पावसाळ्यात निसर्गसौंदर्य पाहायला येतात, पण त्यांची संख्या खूप कमी असते. पावसाळ्यानंतर दिवाळी व नाताळमध्ये दहा ते पंधरा दिवसांचा पर्यटन हंगाम असतो. या हंगामात व्यावसायिकांची जेमतेम कमाई होते.
फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये परीक्षा व वर्षाअखेरच्या सरकारी कामांमुळे पर्यटकांचा ओघ कमी असतो. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये वर्षातून पन्नास ते साठ दिवसच पर्यटन बहरात असते. या साठ दिवसांत कमावलेल्या उत्पन्नातून महाबळेश्वरकरांचा वर्षभराचा चरितार्थ चालतो. यातूनच वर्षभराचे अन्नधान्य खरेदी, सण, उत्सव, विवाह, शाळा-महाविद्यालयांची फी, दवाखाने व इतर खर्चाची पूर्तता केली जाते.
महाबळेश्वरमधील व्यावसायिक आतुरतेने वाट पाहत असलेल्या उन्हाळी हंगामावर करोनाच्या संकटाने घाला घातला. त्यामुळे सुरू होण्याआधीच उन्हाळी हंगाम वाया गेला आहे.
त्यामुळे मिळणारे उत्पन्न बुडालेच आहे, शिवाय लॉकडाऊनमध्ये जवळ असलेली शिल्लकही संपत चालली आहे. रोजच्या कमाईवर अवलंबून असलेले कॅनव्हासर, गाइड, टॅक्सीचालक, घोडेवाले, स्ट्रॉबेरी व इतर वस्तूंचे विक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन व सेवाभावी संस्था गरजूंना मदत पुरवत असले तरी ती अपुरी ठरत आहे. आता पावसाळ्यातील दिवस कसे जाणार, हा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. काही दिवसांनी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर इतर उद्योगधंदे सुरू होतील; परंतु लॉकडाऊनमुळे आलेल्या मंदीचा सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्राला बसणार आहे.