वडोदरा (गुजरात) – चीनमध्ये झालेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वुहान प्रांतात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात येणार आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. बीजिंगमधील भारतीय दूतावासाकडून चीन सरकारशी सातत्याने संपर्क ठेवलेला आहे. चीनमध्ये सध्या वास्तव्याला असलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, याकडे लक्ष दिले जात आहे, असे जयशंकर यांनी सांगितले.
वुहानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांमध्ये तिथे शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांचीच संख्या अधिक आहे. त्यांन मायदेशी आणण्यासाठी लवकरच तिथे एक विमान पाठवले जाईल, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे. भारत सरकारच्या पुढाकाराने लवकरच काही ठोस उपाय योजना केल्या जातील, अशी ग्वाहीही जयशंकर यांनी दिली.
वुहानमध्ये जेथे या विषाणूची साथ पसरली आहे, तेथील भारतीयांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी कालच स्पष्ट केले आहे.