कोलकाता – सीएए कायद्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची आपली तयारी आहे पण त्या आधी मोदी सरकारने हा कायदा रद्द केला पाहिजे मगच आपण त्यांच्याशी चर्चा करू असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की मोदी सरकारच्या निर्णयांविरूद्ध जर विरोधी पक्षाचे लोक आंदोलने किंवा निदर्शने करीत असतील तर ते देशद्रोही ठरत नाहीत. आम्ही पश्चिम बंगाल मध्ये सीएए, एनपीआर किंवा एनआरसी लागू करणार नाही असेही ममतांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
सीएए कायद्या विषयी विरोधकांशी चर्चा करण्याची तयारी पंतप्रधानांनी दर्शवली आहे ही एक चांगली घडामोड आहे पण आधी मोदींनी हा कायदाच रद्द केला पाहिजे. काश्मीर विषयी निर्णय घेताना किंवा सीएए लागू करण्याचा निर्णय घेताना मोदी सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली नव्हती असेही ममतांनी निदर्शनाला आणून दिले. चित्रप्रदर्शनाद्वारे सीएएला विरोध दर्शवण्याचा कार्यक्रम आज झाला त्यावेळी ममता बॅनर्जी बोलत होत्या.