पुणे -“वीक-एंड’चा मुहूर्त साधून खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी या शनिवारी-रविवारी मात्र बाहेर पडणे टाळले. दिवसभर शुकशुकाट असणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये सायंकाळनंतर नागरिकांची वर्दळ काही अंशी वाढल्याचे चित्र शहरात होते.
नेहमीचे गजबजलेले आणि प्रचंड वाहतूक कोंडी असणारा शहर रविवारी दुपारी मात्र ओस पडले होते. सायंकाळनंतर तुलनेने वाहतुकीमध्ये भर पडली होती. कडक ऊन, करोनाची धास्ती आणि सुट्टी असा संगम साधत नागरिकांनी घरी राहण्याला पसंती दिली. सलग सुट्ट्या असूनही शहरातील सुमारे 30 टक्के वाहतूक कमी होती.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील शाळा, महाविद्यालये, नाट्यगृह, चित्रपटगृह, मॉल्स आदी ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. याचे शहरात पालन देखील केले होते, मात्र यामुळे शहरामध्ये वीकएंड असूनही शांतता पसरली होती.
सुट्टीचे औचित्य साधत शहराच्या विविध भागांतून नागरिक खरेदीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये येतात. परंतु, शनिवारी आणि रविवारी गर्दीने ओसंडणारे एफ.सी. रस्ता, जे. एम. रस्ता, डेक्कन, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, सारसबाग, कॅम्प, कोरेगाव पार्कसह नेहमीच वाहतूक कोंडीचे ठिकाण असणारा जेधे चौक आदी ठिकाणी देखील तुरळक नागरिकांची वर्दळ होती. तर दुसरीकडे रविवारच्या निमित्ताने जुना बाजार आणि शनिवार वाडा या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु, या ठिकाणी वावरणाऱ्या अनेकांनी कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे चित्र होते. शहरातील मंदिरे बंद करण्याचे आदेश दिले नसले तरी, बाजारपेठांच्या बरोबरीने शहरातील मंदिरांमध्ये देखील भाविकांची संख्या तुरळक होती. सुट्टीच्या दिवशी मंदिरांमध्ये जाणाऱ्यांच्या नियोजनामध्ये मात्र खंड पडल्याचे चित्र होते. काही मंदिरांमध्ये करोनाविषयीचे जनजागृतीपर फलक देखील लावण्यात आले आहेत.
मार्केट यार्ड सुरूच राहणार
मार्केट यार्डात नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू येत असतात. त्यामुळे भुसार, फूल, फळे आणि तरकरी विभाग सुरूच राहणार आहेत. मात्र, खरेदीदार, व्यापारी, बाजार घटकांनी सरकारने सांगितल्याप्रमाणे खबरदारीचे उपाय घ्यावेत, याबाबत सूचना दिल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. करोनामुळे विविध अफवा पसरत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. बाजारात किराणा माल, तसेच फळे आणि भाज्या मिळतात. नागरिकांनी दररोज खाण्यासाठी लागणाऱ्या या आवश्यक वस्तू आहेत. त्यामुळे बाजार चालू राहणार आहे. त्यामुळे
शासनाचा आदेश येईपर्यंत बाजार सुरळीत सुरू राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
“विद्यार्थ्यांना वसतिगृहाबाहेर काढू नका’
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना बाहेर काढू नका. तसेच त्यांच्या खोल्या रिकाम्या न करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत. शहरातील महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना खोली रिकामी न करण्याच्या सूचना केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी जाण्यास सांगण्यात येत आहे. याविषयी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, विद्यार्थी रहात असलेली वसतिगृहे रिकामी केले जाणार नाही. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना मेसची सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांनी विनाकारण परिसरात फिरणे टाळावे. जर विनाकारण परिसरात फिरत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार आहे.
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा स्थगित
करोनामुळे राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिले आहेत. राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी तसे पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठवले आहे. कोणत्याही कारणास्तव होणाऱ्या गर्दीस करोनामुळे प्रतिबंध आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत आपल्या स्तरावरून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. अशा सूचना आपणास सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने देण्यात येत आहेत. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.